• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यात पावसाची दमदार एन्ट्री!

ByEditor

Jun 10, 2024

कोलाड नाक्यावर पहिल्याच पावसात महामार्गावर साचले पाणी; चिखलमय प्रवास सुरु

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यात पावसाची दमदार सुरूवात झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर भर चौकात तसेच सर्व्हिस रोडचे काम निकृष्ट दर्जाचे त्यात आता उड्डाण पुलाचे काम सुरू केल्याने काही ठिकाणी खोदाई केलेले मातीचे ढिगारे तसेच आहेत. त्यात भले मोठे खड्डे पडल्याने त्यात पाणी साचले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत कसरत करावी लागत असून चिखलमय रस्त्यामुळे रिक्षा, दुचाकी वाहन तसेच पादचारी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

शनिवारी दुपारी तसेच मध्यरात्री पावसाने दमदार एन्ट्री केली. सुमारे चार ते पाच तास पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यामुळे मुंबई गोवा मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील रस्त्यावर पाणीच पाणी साचले. पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी तुंबल्याने अनेकांची तारांबळ उडाली तर लोकांना त्या पाण्यातूनच मार्ग काढाव लागला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला १६ वर्षे पुर्ण झाली असुन या कामात कोणतीही प्रगती नाही. प्रशासनाचा बेजबाबदारपणा व ठेकेदारांचा मनमानी कारभार यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु, या कामासाठी लागणारी जागा उपलब्ध करण्यासाठी येथील किराणा मालाचे व्यापारी, हॉटेल, पान टपरी, कापड व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिक यांना कोणतीही सवड न देता त्यांच्या दुकानावर बुलडोजर फिरवण्यात आला. काही दुकानातील सामानही काढून दिले नाही. याला तब्बल १२ ते १३ वर्ष उलटून गेली तरी देखील काम पूर्णत्वास जात नाही. या उलट तब्बल एवढ्या वर्षानंतर या ठिकाणी उशिराने उड्डाण पुलाचे काम सुरू केल्याने ऐन पावसाळ्यात आता मार्गाच्या दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोड देखील वाहतुकीमुळे अधिक खड्डेमय झाल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्याने ते पाणी पादचारी नागरिकांच्या अंगावर उडून त्यांचा जलाभिषेक होत आहे.

मुंबई गोवा महामार्गावर तसेच कोलाड आंबेवाडी नाका हे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असुन येथून मुंबई गोवा तसेच पुणे, रोहा, मुरुड, अलिबागकडे जाण्यासाठी प्रचंड मोठया प्रमाणात वाहतूक सुरु असते. ही वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरु केल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. काही ठिकाणी रस्त्याची डांबर निघून गेल्यामुळे रस्त्याचे खडे वर आल्यामुळे या रस्त्यावरुन दुचाकी गाड्या स्लिप होत आहेत. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण निद्रावस्थेत असलेले प्रशासन व प्रशासनाचा ठेकेदारावर नसलेला वचक यामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले तरी रस्त्याचे काम पुर्ण होत नाही. खचलेल्या व निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल प्रवाशी वर्गातुन उपस्थित केला जात आहे.

सुरुवातीच्या हलक्या स्वरूपाच्या पावसात कोलाड आंबेवाडी नाक्यावर ही अवस्था असेल तर पुढे अधिक पडणाऱ्या मुसळधार पावसात काय अवस्था पाहावयास मिळेल याची कल्पनाच न केलेली बरी अशी प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात आहे. सर्व्हिस रोडवर जागोजागी पाणी साचत असल्याने प्रवासी एसटी बस नक्की नक्की कुठे थांबते यासाठी प्रवाशी वर्गाची धावपळ होत असून कोलाड खांब प्रवासी रिक्षा चालकांचे देखील रिक्षा उभी करण्यासाठी या रस्त्याच्या कामामुळे मोठी पंचाईत होत असल्याने प्रवाशी वर्गाची मोठी हेळसांड होताना दिसत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!