पाटणसई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेश देवरे यांची मागणी
किरण लाड
नागोठणे : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जोरात चालू आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे नजिक चिकणी गावातील ग्रामस्थांना, महिलांना, वाहनांना, शाळकरी मुलांना महामार्गावरुन ये-जा करतांना, महामार्ग ओलांडताना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्या मार्गी लावण्यासाठी, तसेच संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी रहदारासाठी, वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता मिळावा तसेच या भागातील महामार्गावर स्पीडब्रेकर टाकुन मिळावे अशी मागणी पाटणसई ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते नरेश देवरे यांच्यासह चिकणी ग्रामस्थांनी शासनाकडे व राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे केली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग क्रं. 66 हा 471 किलोमीटर लांबीचा आहे. कोकणच्या पर्याटनाला चालना मिळण्यासाठी सन 2011 ला या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे ठरवले. या चौपदीकरणामुळे मुंबई गोवा हा प्रवास 6 तासांनी कमी होणार आहे. वनविभागाच्या अखत्यारीतील जमिनीचा भूसंपादनाचा प्रश्न, संपादित जागेला वाढीव दरासाठी जमिन मालकांची शासनाकडे मागणी, कोर्टात जमीन अधिग्रहणाचे दावे, प्रतिदावे या अनेक कारणांमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 13 वर्ष रखडले आहे. चौपदरीकरणाच्या वेळी या महामार्गावर अनेकांना आपला जीव गमवायला लागलेला आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चालू असतांना वाहतुकीचा खोळंबा, अपघाताचे वाढते प्रमाण, कोकणवासीयांना सणासुदीला कोकणात जाताना, येताना होणारा मानसिक, शारीरीक त्रास, मोर्चे, उपोषण, लोकप्रतिनिधींची मानसिकता या अनेक कारणांमुळे 13 वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग चर्चेत राहिलेला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे नजिक चिकणी गावातील ग्रामस्थांना, महिलांना, विद्यार्थ्यांना महामार्गाच्या पलीकडे जाण्यासाठी तसेच परत गावाकडे येण्यासाठी महामार्ग ओलांडून जावे लागते. दोन्ही बाजुने रस्ता ओलडतांना ग्रामस्थांना प्रसंगी जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. तसेच महामार्गावरील वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या, त्यांचा महामार्गावर तासी 80 किमीचा वेग अशा भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांकडून एखाद्या ग्रामस्थाचा, शाळकरी मुलाचा अपघात होण्याची शक्यता नाकारु शकत नाही. तशी अपघाताची घटना चिकणी येथील महामार्गावर नुकतीच घडलेली आहे. 6 जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अलिबाग येथील दोन तरुण जात होते. त्यांचे वाहन चिकणी गावाजवळील महामार्गावर आले असता अपघातग्रस्त झाले. त्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. महामार्गाच्या चौपदीकरणाची प्रलंबित कामे, रस्त्यावर आलेली माती, मार्गदर्शक फलक नसणे या असंख्य कारणाने महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या, ग्रामस्थांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिकणी गावाजवळील ग्रामस्थांना रहदारासाठी, दळणवळणासाठी पर्यायी रस्ता द्यावा तसेच या भागातील महामार्गावर स्पीडब्रेकर टाकुन मिळावे जेणेकरुन ग्रामस्थांना महामार्गावर प्रवास करणे सोयीचे होईल अशी मागणी पाटणसई ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते नरेश देवरे यांच्यासह चिकणी ग्रामस्थांनी शासनाकडे तसेच राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे केली आहे.