नडगाव संगम परिसरात मृत माशांचा खच
मिलिंद माने
महाड : पावसाळा सुरू होऊन फक्त काही दिवसच झाले असताना महाड औद्योगिक परिसरात प्रदूषणाचा नंगानाच सुरू झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील गटारे रंगीत पाण्याने रंगली असून नडगाव गावाजवळील संगमावर या प्रदूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला आहे.
महाड औद्योगिक वसाहती जवळील नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत पावले आहेत. प्रदूषण रोखण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असमर्थ ठरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मात्र प्रदूषणकारी कारखाने मालक या संधीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रदूषणकारी पाणी नाल्यात सोडत आहेत.

महाड एमआयडीसी प्रदूषणाच्या बाबतीत कायमच चर्चेत राहीली आहे. गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न सातत्याने भेडसावत असून याबाबत अद्यापही ठोस उपायोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. एमआयडीसीमध्ये सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात बदल झाला आहे, मात्र तरी देखील आजही अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी नदीमध्ये मिसळले जात आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण करणारे कारखानदार पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन आपल्या क्षेत्रातील सांडपाणी थेट नदीत सोडून देत आहेत. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील सावित्री आणि काळ या दोन नद्या प्रदूषित होत आहेत. या प्रदूषित पाण्यामुळे जलचरांचे जीव धोक्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसाचा फायदा कोणत्यातरी कंपनीने घेतल्याने रसायन मिश्रित सांडपाणी नदीमध्ये गेले. यामुळे नडगाव गावाजवळील संगमाजवळ नदीतील मासे मोठ्या प्रमाणावर मृत पावले. या परिसरात मृत माशांचा खच पडला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी झाल्याने परिसरातील नागरिकांना देखील त्याचा त्रास होत आहे.
पावसाळा सुरू होऊन काही दिवस झाले आहेत तोच महाड एमआयडीसीमधील गटारे, नाले आणि शेजारील नद्या प्रदूषित पाण्याने रंगू लागल्या आहेत. पाऊस पडल्याने हे पाणी थेट नदीला जाऊन मिळत आहे. महाड एमआयडीसीमधील टेमघर नाला, जिते गावाजवळील नाला आणि इतर औद्योगिक क्षेत्रातील नाले या प्रदूषित पाण्यामुळे रंगून गेले आहेत. या नाल्या मधील पाणी काळ आणि सावित्री नदीला जाऊन मिळत आहे. पावसाळा सुरू होताच अनेक छोट्या मोठ्या कंपन्या सांडपाणी प्रक्रिया खर्च वाचवण्यासाठी आपल्याकडील पाणी थेट नाल्यात सोडून देत आहेत. याबाबत अनेक वेळा तक्रारी होऊन देखील अद्याप बदल झालेला नाही. अधिवेशन काळात देखील इतर भागातील आमदारांनी महाडच्या प्रदूषणाबाबत आवाज उठवला मात्र, याबाबत देखील ठोस कारवाई झालेली नाही. महाड एमआयडीसी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या भंगार व्यावसायिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात सांडपाणी तसेच वाया जाणारे रसायन उचलले जाते. या भंगार व्यवसायिकांकडून देखील सोडण्यात आलेले रासायन मिश्रित पाणी नाल्यामध्ये जाते. याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाकडून केवळ नोटिसा बजावण्याचे काम केले जात आहे. यामुळे कंपन्या उदंड झाल्या आहेत.
रासायनिक सांडपाण्यामुळे काळ आणि सावित्री नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेली अनेक वर्षात नदीमध्ये जलचर मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसानंतर रसायन मिश्रित पाणी नदीत मिसळल्याने नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मेले आहेत. मृत माशांचा खच काळ आणि सावित्री नदीच्या संगमावर पडलेला आहे. नदी किनाऱ्याला हे मृत मासे पडून असल्याने या परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे. छोट्या माशांपासून मोठे मासे तसेच कोळंबी आदी प्रकारचे मासे या पाण्यात तरंगू लागले आहेत. या जलचरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
महाड एमआयडीसीमधील कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी पावसाचा फायदा उठवत नदीत सोडले जाते. यामुळे नदीमधील जलचर धोक्यात आले आहेत. गेली दोन दिवसापासून नदीत मृत माशांचा खच पडला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे
इफ्तिकार काळसेकर,
स्थानिक ग्रामस्थ