वीज अखंडीत चालू ठेवण्याची व संपर्कासाठी हेल्पलाईन चालू करण्याची मागणी
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे वीजेच्या तारांवर पडतात. तसेच सततच्या पावसामूळे अधूनमधून कधी दिवसा तर कधी रात्री वीज मोठ्या प्रमाणात खंडीत होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, हॉस्पीटलमधील पेशंट आदि लोकांना मोठया प्रमाणात बसतो. सारखी वीज येत जात असल्याने नागरिकांच्या घरातील फॅन, टीव्ही, फ्रिज आदी उपकरणेही खराब होत असल्याने त्याचा आर्थिक फटका विनाकारण सर्वसामान्य नागरिकांना बसत असतो. एखादया भागात वीज गेली असता त्या भागातील वीज न घालवता संपूर्ण उरण तालुक्याची वीज घालवली जाते व कर्मचारी कामे करतात. मुसळधार पाउस पडल्यानंतर झाडे वीजेच्या तारांवर अनेक तास ती तशीच पडून राहतात. कर्मचारी वर्ग वेळेत कधीच येत नाहीत. तेथे वेळेत कोणताच कर्मचारी फिरकत नसल्याने रस्त्यावर ट्रॅफिक होते. शिवाय नागरिकांना वीजेपासून तासनतास वंचित राहावे लागते. या सर्व वीजेच्या समस्यांसंदर्भात नागरिकांनी महावितरणाच्या कार्यालयात फोन केला असता तो फोन देखील बंद असतो. जरी लँडलाइन फोनची रिंग वाजली तरी फोन कोणीच उचलत नाहीत. त्यामूळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या कारणामूळे लाईट गेली याची माहिती मिळत नाही. रात्री अपरात्री पाऊस, वादळवाऱ्यामुळे कुठे काही अनूचित घटना घडली किंवा अपघात घडला तर अशा आणीबाणीच्या वेळी नागरिकांचा फोनद्वारे महावितरणच्या कार्यालयात संपर्क होत नाही. महावितरण उरण कार्यालयाचा फोन बंद असतो किंवा फोन उचलला जात नाही. अशावेळी नागरिकांनी काय करावे असा सवाल उपस्थित होत आहे.

या उरणच्या सर्वसामान्य जनतेची पावसाळ्यातील वीजेची महत्वाची समस्या लक्षात घेऊन पावसाळ्यात वीज खंडीत करू नये. ज्या विभागात किंवा भागात काम चालू असेल तर फक्त त्या भागातील वीज घालवावी, कामासाठी इतर ठिकाणाची वीज बंद करू नये. नागरिकांना आपली समस्या, तक्रार फोनद्वारे कार्यालयात कळविण्यासाठी त्वरित लँडलाईन (हेल्पलाईन) सुरू करून जनतेच्या समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, पनवेलच्या विभागीय प्रमुख भावना घाणेकर यांनी प्रधान सचिव (मुंबई मंत्रालय), उर्जामंत्री (मुंबई मंत्रालय), जिल्हाधिकारी रायगड, उपायुक्त परिमंडळ झोन २, तहसिलदार उरण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उरण, मुख्य अभियंता महावितरण उरण, महाराष्ट्र विद्युत मंडळ उरण आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन केली आहे.
सदर समसयेवर वेळीच योग्य ती उपाय योजना झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर पनवेल विभाग प्रमुख भावना घाणेकर यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच होणाऱ्या परिणामास स्वतः प्रशासनास जबाबदार धरले जाईल असा आक्रमक इशारा भावना घाणेकर यांनी प्रशासनाला दिला आहे. प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर व रायगड जिल्हा सरचिटणीस गणेश (नाना) नलावडे यांनी विविध शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर समस्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. सर्व समस्यांवर सर्वच अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उरणच्या नागरिकांच्या विजे सारख्या महत्वाच्या समस्येवर भावना घाणेकर व गणेश (नाना) नलावडे यांनी आवाज उठविल्याने उरणच्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस गणेश (नाना) नलावडे यांचे आभार मानले आहेत.
ग्राहकांची समस्या लक्षात घेऊन ती तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करू. सदर समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या समस्यांची योग्य ती दखल घेतली जाईल.
सिंहाजीराव गायकवाड,
अधीक्षक अभियंता वाशी, नवी मुंबई