पावसाळी पर्यटकांची गैरसोय होणार दूर; मंडळाच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक
अब्दुल सोगावकर
सोगाव : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सचिन घाडी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील रामधरणेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बंधाऱ्याची स्वच्छता केली.
या बंधाऱ्याच्या आतील भागात व बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे व गवत वाढले होते, तसेच वाहून आलेला कचरा देखील मोठ्या प्रमाणात साचला होता. यामुळे याठिकाणी येणाऱ्या पावसाळी पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. हि बाब मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व सचिन घाडी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर रविवार, दि. ९ जून २०२४ रोजी बंधाऱ्याच्या आतील भागातील व बाहेरील परिसरातील भागात वाढलेली झाडेझुडपे, वाढलेले गवत, वाहून आलेला कचरा याची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करत योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या बंधाऱ्याच्या काही अंशी केलेल्या स्वच्छतेमुळे याठिकाणी येणाऱ्या गावातील व पंचक्रोशीतील तसेच पावसाळी पर्यटकांची होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न सचिन घाडी मित्रमंडळाने केला आहे. याबद्दल सचिन घाडी मित्रमंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी बंधाऱ्याच्या संबंधित जलसंधारण विभाग व मापगाव ग्रामपंचायत प्रशासक यांच्याकडे मागणी करताना सांगितले आहे की, बंधाऱ्याच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे आणि तो गाळ काढणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून बंधाऱ्याची पाण्याची साठवण क्षमता वाढून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. तरी आतील भागात असलेला गाळ लवकरात लवकर काढावा, अशी मागणी केली आहे
बंधाऱ्याच्या स्वच्छता अभियानात निकेश अनमाने, सतिश घाडी, आत्माराम पंडम, प्रसाद मसुरकर, प्रतिक अनमाने, सुयोग अनमाने, संजय अनमाने, गौरव मोंढे, अशोक मोंढे, रोशन अनमाने, गितेश ठकरुळ, अक्षय नागावकर, जयेश ठकरुळ, सार्थक अनमाने, पियुष घाडी, सोहम निकम, तुषार मोंढे, अभिषेक जुईकर व इतर कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.