दुचाकीस्वारांना करावी लागते तारेवरची कसरत
अपघात घडल्यावर उपाययोजना करणार का?
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या गलथान कारभारामुळे इंदापूर पेण दरम्यान प्रवाशांना काही ठिकाणी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेली पंधरा वर्ष या मार्गाच्या कामाची रखडपट्टी सुरु असून याचे काहीच सुखदुःख सरकारला नाही. पुन्हा पावसाळा सूरू होताच कोलाड नागोठणे दरम्यानच्या खांब येथील बनवलेल्या पादचारी पुलाची अवस्था अतिशय गंभीर असून पुलावरून पाणी पाझरल्याने पुलाखाली गुडघाभर पाणी साचले आहे. आधीच पुलाखालून जाण्याच्या मार्गावर भला मोठा खड्डा पडला असल्याने मार्ग काढताना दुचाकीस्वारांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाणी साचल्याने येथे मोठी दुर्घटना घडू शकते. अपघात घडल्यानंतरच येथे उपाययोजना केल्या जातील का? असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे.
खांब पादचारी पूल हा तयार केल्यापासुनच दर पावसाळ्यात पुलावरून पाणी पाझरत आहे. मागील मे महीन्यात याची दुरूस्ती करण्यात आली. काँक्रीटीकरण नव्याने करण्यात आले. तरीदेखील पुलाखाली गुडघाभर पाणी साचून राहिले आहे. पादचारी नागरिक यांच्या जाण्या येण्याच्या मार्गावरच भला मोठा खड्डा पडला आहे. त्यात गुडघाभर पाणी साचून राहिल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनचालकांना यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाला की ही समस्या खांबकरांच्या पाचवीलाच पुजलेली असल्याने संताप व्यक्त होत आहे.
लोखोंची उलाढाल असलेली नामवंत अशी खांब ग्रामपंचायत. मात्र ग्रामपंचायतीला देखील नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या ठेक्यासाठी अनेक पुढाऱ्यांची धावाधाव सुरू असते मात्र, नागरिकांच्या या मुलभूत सुविधांकडे कायम कानाडोळा केला जात आहे. सदरच्या पुलाखाली दर पावसाळ्यात पाणी साचून राहिल्याने मोठा त्रास येथील प्रवासी नागरिक तसेच खांब येथील बाजारात खरेदी करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांना होत आहे.
सन २०२० व २१ मध्ये येथील ग्रामस्थांनी कोकणचे भाग्यविधाते दस्तुरखुद्द खासदार सुनील तटकरे यांच्याकडे याबत तक्रार व्यक्त केली होती. खासदार तटकरे यांच्याकडे अनेकांनी या मार्गाच्या तक्रारींचा पाढा वाचला. तदनंतर इंदापूर, कोलाड, खांब ते पळस्पे या मार्गाच्या कामाची पाहणी सुनील तटकरे यांनी केली. त्यात कोलाड येथील कुंडलिका नदी पात्रावरील पुलाचे अर्धवट काम तसेच पुई येथील महिसदरा नदी पात्रावरील पुल लवकरात लवकर उभारण्यात यावा तसेच खांब येथील या पादचारी पूलाचा देखील समावेश करण्यात यावा अशा सूचना तत्कालीन अधिकारी ठेकेदाराला देण्यात आल्या. मात्र, आजतागायत त्यावर कोणतीच उपाय योजना करण्यात आली नसल्याने कुंडलिका नदी पात्र पुलाचे काम अर्धवट, पुई नदी पात्र पुलाचा पत्ताच नाही तर सदरच्या खांबच्या पुलाखालील परिस्थिती याही वर्षी ‘जैसे थे’च आहे. दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोडवर पहिल्याच पावसात खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहे. कोलाड नाक्यावर भर पावसात उड्डाणपुलाचे काम सूरू करण्यात आले आहे. या ठिकाणी देखिल खड्ड्यांची समस्या तसेच वाहतूकोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी वर्गाला या सर्व समस्यांना तोंड देत तारेवची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे कऱण्यात आले असून खांब येथील बनविण्यात आलेल्या सर्व्हिस रोडवर खड्डे पडले आहेत. तसेच पादचारी पुलाखाली गुडघाभर पाणी साचून राहत असल्याने येथून दुचाकी तसेच रिक्षा चालक यांना मार्गक्रमण करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. पादचारी नागरिकांची तर अक्षरशः तारांबळ उडत आहे. त्यामुळे संबधीत अधिकारी अथवा ठेकेदार यांनी यावर उपाययोजना कराव्यात.
अलंकार खांडेकर,
संस्थापक-अध्यक्ष, शिवशंभो सामाजिक मंडळ
मार्गावरील खांब, पुई, कोलाड आंबेवाडी नाका, भिरा फाटा ते तीसे तळवली या दरम्यानचा प्रवास तर अक्षरशः या पावसाळ्यात धोक्याचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुन्हा निवडून आलेले खासदार सुनील तटकरे हे पुन्हा या रखडलेल्या कामासाठी कोणती भूमिका घेतात तसेच त्यावर काय उपाययोजना करणार हे पाहणे गरजेचे आहे. |