धाटावच्या केंद्रीय शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट
शशिकांत मोरे
धाटाव : १५ जून म्हटलं की, विद्यार्थ्यांना उत्सुकता असते शाळेच्या पहिल्या दिवसाची. उन्हाळी सुट्टी संपली आणि वरुणराजाच्या आगमनानंतर पुन्हा एकदा आज शनिवारपासून प्रत्यक्षात धाटावच्या केंद्रीय शाळेत सकाळच्या शाळेला सुरुवात झाली. महिना दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शाळेत जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि वेगळाच आनंद पहावयास मिळाला. शिक्षक वर्गाकडून वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे स्वागत करताना दिसून आले. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकवर्ग देखील मोठ्या हौसेने हजर झाल्याचे पहावयास मिळाले. शालेय परिसरात विद्यार्थ्यांचा किलबिलाटही पहायला मिळाला.
जिल्हा परिषदेच्या दोन हजार ५२८ शाळा आज १५ जून रोजी सुरू होत असून यामधे अंदाजे ९१ हजार ३४८ मुले, मुली शिक्षण घेणार आहेत. नवीन वर्ग कोणता असेल? वर्गशिक्षक कोण असतील? याची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याचबरोबर सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाऊन आल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींना बऱ्याच दिवसांनी भेटल्याचा आनंदही दिसत होता. रोह्यात ६ जून रोजी पावसाने हजेरी लावल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी पावसाने आपली छाप पाडली. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी रेनकोट आणि छत्री घेऊन जाताना दिसत होते. नवीन छत्री, नवीन रेनकोट घेऊन शाळेत जाताना विद्यार्थी उत्साहात होते.
विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प,चॉकलेट, खाऊ वाटप करण्यात आले. तर विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुलांची उधळण करण्यात आली. शाळेचा हा पहिला दिवस उत्साहात साजरा झाला असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. शाळेबाहेर रांगोळ्या काढण्यात आल्या असून, सूचना फलक, फळे सजविण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराभोवती शिक्षकवर्ग, कर्मचारी स्वत: उभे राहिले होते.
धाटावच्या केंद्रीय शाळेत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक सुनील पारठे, केंद्रप्रमुख गायकर सर, शिक्षक मानसी थळे, निकिता धुपकर, प्रणाली जंगम, मोहिनी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक भोकटे यासह सदस्य व भोकटे वहिनी यासह कर्मचारी वर्ग याठिकाणी उपस्थित होते.