मिलिंद माने
महाड : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात पालकांची लगबग सुरु झाली आहे. प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याच्या किमतीत होणारी वाढ यावर्षी देखील थांबली नाही. नियमित वापरातील वह्यांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर अन्य शैक्षणिक साहित्य, गणवेश, विद्यार्थी वाहन फी, प्रवेश फी यामधील वाढ पालक वर्गात चिंता निर्माण करणारी आहे. त्याचबरोबर बहुतांश खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या वह्या शाळेतूनच घेण्याचा नियम केल्याने शैक्षणिक साहित्याची विक्री करणारे विक्रेते चिंतेत पडले आहेत.

नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. यामुळे पालक वर्गाची आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु आहे. त्याचबरोबर शैक्षणिक वर्षात लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी देखील लगबग सुरु आहे. महाड बाजारपेठेत सध्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. गेली काही वर्षापासून काही शाळा शैक्षणिक साहित्य शाळेतूनच घेण्याचा आग्रह करत असले तरी विविध वह्या, पुस्तके, गाईड्स, आणि पावसाळी चप्पल, दफ्तर, घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. शासनाने शिक्षण संस्थांना कितीही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तरी आजही शाळांमधून शैक्षणिक साहित्य विक्री केलीच जात आहे. यामुळे बाजारपेठेत शैक्षणिक साहित्य विक्रीवर परिणाम जाणवू लागला आहे. यावर्षी वह्यांच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. विविध कर आणि गुणवत्ता आदीचा विचार करत कंपन्यांनी हि वाढ केली आहे. मात्र, शैक्षणिक साहित्यावर असलेले दर आणि विक्री करताना ग्राहकांना दर कमी करत विक्रेते साहित्य देत आहेत. मात्र शाळांमधून एमआरपी दरानेच शैक्षणिक साहित्य दिले जात असल्याने पालकांची मोठी फसवणूक होत आहे तर शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या शाळांचा चांगलाच फायदा होत आहे.
यावर्षी नियमित आकाराच्या वह्यांमध्ये किमान १५ ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. पाल्यांच्या शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या पालकांचा या वस्तू खरेदीकडे असलेला कल वाढला आहे. शाळा आणि कॉलेजकरिता लागणारे नोटबुक, लॉंग बुक, कंपास, कव्हर रोल यामध्ये देखील वाढ झाली आहे. यापूर्वी ४० ते ६० दरम्यान, कंपास पेटीची किंमत आता ८० ते १३० रुपयांपर्यंत झाली आहे. तर अन्य शैक्षणिक साहित्यात देखील किमान २५ ते ३० रुपयांची दरवाढ झाली आहे.
शैक्षणिक वर्ष सुरु होताच कंपन्यादेखील नाविन्यपूर्ण बदल करत शैक्षणिक साहित्य बाजारात आणतात. यामुळे विद्यार्थ्यांची मागणी देखील बदलत असते. या बदलत्या साहित्याचे दर देखील आधीच गगनाला भिडलेले असतात. मात्र शिक्षण हा एक विषय डोक्यात धरून पालक देखील या वस्तू खरेदी करताना मागेपुढे पाहत नाहीत. शाळांमधून वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य पुरवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मात्र शाळा देईल त्याच गुणवत्तेचे साहित्य पालकांना घ्यावे लागत आहे. याचा बाजारपेठेवर देखील परिणाम होत आहे. वाढत्या महागाईच्या जमान्यात आता शैक्षणिक साहित्य घेणे न परवडणारे झाले आहे. गेली दोन वर्षात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यामुळे झालेले आर्थिक नुकसान आजही भरून निघालेले नाही. त्यातच अनेक भागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. यातून बाहेर पडणे शक्य नसतानाच झालेली महागाई आणि आर्थिक नुकसान यामुळे ग्राहकांनी शैक्षणिक साहित्य खरेदीला अद्याप तरी गती आलेली नाही.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी वह्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर इतर शैक्षणिक साहित्याच्या किंमती देखील वाढल्या आहेत. शाळांमधून वह्या पुरवल्या जात असल्या तरी ग्राहक विविध दर्जाच्या वह्या पाहण्यास येतो. मात्र शैक्षणिक साहित्य शाळेतच मिळत असल्याने स्टेशनरी व्यवसाय धोक्यात आला आहे.
-मुबीन देशमुख,
स्मार्ट स्टोअर्स, महाड.