महाराष्ट्राची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर सुरू आहे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मिलिंद माने
महाड : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर आज ३५१वा शिवराज्याभिषेक जल्लोषात साजरा झाला. मागील दोन दिवसापासून सायंकाळी पडणारा पाऊस आणि दाट धुके अशा आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावर आज तिथी प्रमाणे ३५१वा शिवराज्याभेषीक दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. पहाटेच्या मंगलमय वातावरणात सनई चौघड्याचे मंगलमय सूर, ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात या सोहळ्याला प्रारंभ झाला.

किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक होताच जमलेल्या हजारो शिवभक्तांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशी एकच ललकारी दिली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावर आपला शिवराज्याभिषेक साडेतीनशे वर्षापूर्वी केला. या शिवराज्याभिषेकाचा वर्धापनदिन शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर या सोहळ्याचे भव्य आयोजन शासनाच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी किल्ले रायगडवरील राजदरबारात असलेली मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती. गडावर दोन दिवस विविध धार्मिक विधी, पुजापाठ, वेद मंत्रघोशाने रायगडावर मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गडावरील विविध देवी देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणुक काढुन महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरूवात झाली. शिवरायांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन करून नंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधुंच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. सुर्योदयाच्या वेळीचे अल्हादायक वातरवरण आणि शिवप्रेमींमधील अलोट उत्साह यामुळे रायगडावर वेगळेच उल्हासीत वातावरण निर्माण झाले होते.

किल्ले रायगडावर शिवकालीन पारंपरिक वेशभुषेतील शिवप्रेमी, वाऱ्यावर फडकणारे भगवे ध्वज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि ढोल, ताशे, तुतारीचे स्वर याने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. सुनील तटकरे, आ. भरत गोगावले यांनी देखील हजेरी लावली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर मंगलमय वातावरणात सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेकाच्या धार्मिक विधींना सुरूवात झाली. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात वेदउच्चारासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सिंहासनाधिष्टीत करण्यात आली. सिंहासनावर आरूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. हा क्षण उपस्थित शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला नेऊन ठेवणारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होताच संपुर्ण रायगडावर एकच जल्लोष साजरा झाला. जय भवानी, जय शिवरायच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमुन गेला. ढोलताशांच्या गजरात हजारो शिवभक्त बेधुंद हेाऊन नाचू लागले. भगवे झेंडे, तलवारी, भाले आकाशाच्या दिशेने उंचावीत शिवभक्तांनी आपला आनंद व्यक्त केला. किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळ्याची सांगता पालखी मिरवणुकीने करण्यात आली.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यातून सुराज्य निर्माण केले. शिवरायांची हि संकल्पना प्रत्यक्षात आणून सुराज्य निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवरायांच्या विचारांवर वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केले. शिवाय महाराष्ट्रातील गडकिल्ले जागतिक वारसा यादीमध्ये समावेश होतील असा विश्वास देखील व्यक्त केला. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा जितके दिवस कराल तितका कमी पडेल. कारण महाराजांचे कर्तृत्व आणि त्याग मोठा आहे. तर आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची मनापासून काळजी घेतली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. महाराजांनी स्थापन केलेले राज्य हे लोक कल्याणकारी राज्य होतं. शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे नुकसान होईल असा कोणताही निर्णय महाराजांनी घेतला नाही असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले.
व्हीआयपी नेत्यांच्या आगमनाने सामान्य शिवप्रेमींचे हाल
आज रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. या सोहळ्याकरता राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. मात्र, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर विविध विभागाचे मंत्री, आमदार, अधिकारी उपस्थित असल्याने रायगड रोपवे काही काळ सामान्य शिवप्रेमींसाठी बंद ठेवला होता. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास तीन किलोमीटर अंतरावरच वाहने थांबवण्यात आली होती. यामुळे शिवप्रेमींवर पायी चालत जाण्याची वेळ आली. तसेच रोप वे मध्ये प्रवेश नसल्याने काही शिवप्रेमींना गडावर न जाताच परत जावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या व्हीआयपींनी आमच्यासारखे तीन किलोमीटर चालून दाखवावे म्हणजे सामान्य शिवभक्ताचे काय हाल होतात हे राजकीय पुढाऱ्यांना व मंत्र्यांना कळेल अशा प्रतिक्रिया शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या लाखो शिवभक्तांकडून व्यक्त केल्या जात होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर असणाऱ्या रायगड रोप वेच्या उपहारगृहात राज्याचे मंत्री, आमदार, खासदार व शासकीय अधिकाऱ्यांना मनसोक्त व पोटभर उच्चप्रतीचा अल्पोपहार ठेवण्यात आला होता. मात्र, त्याकडे सामान्य शिवभक्तांना बघण्यापासून देखील पोलिसांनी रोखले होते. त्यामुळे जनतेच्या पैशावर जगणारे राज्यकर्ते शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येतात मात्र, सामान्य शिवभक्तांना कोणता आदर्श देतात असा सवाल रायगडावर आलेल्या शिवभक्तांच्या तोंडून ऐकण्यास मिळत होता. एकीकडे राज्याभिषेक सोहळ्याकडे व्हीआयपी सुरक्षेच्या बंदोबस्तामध्ये येऊन शिवभक्तांना हाच का आदर्श देतात? असा संतप्त सवाल अनेक महिलांनी व शिवभक्तांनी उपस्थित केला.