विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर ऐन पावसाळ्यात प्रवाशी वर्गाला एसटी बस पकडणे अवघड झाले असून बस पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहिल्याने बस आली रे आली की एकच धावाधाव होत असून आज गुरुवार, दि. २० जून रोजी पहाटे प्रवास करणारी एक वयोवृद्ध महीला भर पावसात पाय घसरून पडली असल्याचे समजते. या महिलेला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. महिलेला तिचे नातेवाईक व काही प्रवाशांनी उचलून धीर देत विचारपूस केली. एका मिठाई दुकानदाराने ताबडतोब मलम आणून दुखापत झालेल्या पायाला लावले. मात्र, या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून प्रवाशांचा जीव गेल्यावर या ठिकाणी सुविधा उपलब्ध केल्या जातील का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कोकणातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे कोलाड आंबेवाडी नाका. हा नाका सर्वांनाच सुपरिचित असल्याने या ठिकाणाहून प्रवाशी वर्गाला सर्व ठिकाणी प्रवास करण्यास सोईस्कर होत असल्याने अनेक प्रवाशी या नाक्याला पसंती देतात. परंतु याच नाक्यावरून आता प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गाला एसटी बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवास धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल हाल होत आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेली १७ वर्षे चालू असून येथील कोलाड आंबेवाडी नाका येथे ऐन पावसाळ्यात उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अरुंद अवस्थेत असल्याने पावसात भले मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचून राहत आहे. गुडघाभर पाणी तसेच चौकात उड्डाण पुलाचे खोदकाम सुरू असल्याने येथील सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्यावतीने पूर्वी बनविलेल्या प्रवासी निवारा शेड या तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोलाडहून मुंबईकडे प्रवास करणारे प्रवाशी, तर कोलाडहुन रोहा मुरुड, त्याच बरोबर कोलाडहून सुतारवाडी, भिरा, पुणे तसेच इंदापूर, माणगाव, महाडसह तळ कोकणात तसेच महाबळेश्वर, वाई, सातारा, कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच शाळा, कॉलेज, महाविद्यायांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांना या ठिकाणी पावसाळ्यात एसटी बस पकडण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बस या मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने कुठे मागे पुढे थांबल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अक्षरशः धावाधाव होत असल्याने साचलेले पाणी आणि चिखलामुळे पाय घसरून प्रवाशी पडत असल्याच्या घटना घडत आहेत.
तरी संबधीत खाते आणि अधिकारी वर्गाने याकडे विशेष लक्ष केंद्रित करून येथील प्रवाशी वर्गाला सोईस्कर प्रवास तसेच एसटी बस पकडण्यासाठी आणि त्यांना उभे राहण्यासाठी निवारा शेड उभारावी अशी मागणी प्रवाशी नागरिकांनी केली आहे.