विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी नाक्यावरील मुख्य बाजारपेठेतील चौकात रस्त्याला भला मोठा खड्डा पडला असुन यामुळे वाहन चालकांसह प्रवाशी वर्गाच्या जीवितास धोका निर्माण झाला असुन यावर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाक्यावरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आंबेवाडी ग्रामपंचायतीतर्फे ठेकेदारासहित तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी रास्ता रोको देखील केला. कोलाड पोलिस ठाण्यात निवेदन दिले. कोलाड पोलिसांनी तातडीने ठेकेदाराच्या इंजिनियर याला घेऊन रस्त्याची पाहणी केली. यानंतर या रस्त्याचे थातुरमातुर काम करण्यात आले. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत असुन “रोज मरे त्याला कोण रडे” अशी परिस्थिती आंबेवाडी बाजारपेठेतील झाली असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला १६ वर्षांपूर्वी सुरुवात झाली असुन सर्व कामे अतिशय संथगतीने सुरु असुन कोणत्याही कामाला उत्तम प्रकारचा दर्जा नाही. या मार्गांवरील मोऱ्या, गटारे, साईडपट्ट्या, सिमेंटकाँक्रीटचा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा बनविला आहे. काही ठिकाणच्या जुन्याच मोऱ्यांवर सिमेंटचा रस्ता बनविला आहे, तर बनविलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत. गटाराचे कामही अर्धवट तर साईडपट्ट्याही अतिशय निकृष्ट दर्जाच्या बनवल्या आहेत. या साईडपट्ट्यात दररोज वाहने अडकून अपघात होतांना दिसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेत परिस्थिती अतिशय बिकट असुन येथील बायपास रस्त्याचे सिमेंटकाँक्रीटचे रस्त्याचे काम न करता उड्डाण पुलाचे काम सुरु केले आहे. ते पण पावसाळा सुरु झाल्यावर सुरु केल्यामुळे बायपास रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. तसेच गटाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बाजारपेठेत पाणी साचून राहत आहे. पाण्यामुळे रस्त्याला पडलेले खड्डे दिसत नसल्याने येथे दररोज अपघात होत असुन एखाद्याचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण?
-चंद्रकांत लोखंडे,
सामाजिक कार्यकर्ते