• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोकणात झालेल्या पराभवाचा बदला विधान परिषदेच्या निवडणुकीत घ्या; नाना पटोलेंच्या सूचना

ByEditor

Jun 21, 2024

प्रतिनिधी
ठाणे :
भारतीय जनता पक्षाने लोकसभेची निवडणूक षडयंत्र करून जिंकली आहे. बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत ही जनतेची मागणी आहे, जनतेचा ईव्हीएम वर विश्वास नाही त्यासाठी देशभरात आंदोलने झाली.

अमेरिका, जपानसारखे जगातील अनेक प्रगत देश बॅलेट पेपरवर निवडणुका लढवतात पण भारतातच ईव्हीएम कशासाठी वापरली जात आहे. लोकसभा निवडणुकीत धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला, प्रशासनाला हाताशी धरून षडयंत्र करुन भाजपाने जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कोकणात झालेल्या पराभवाचा पदवीधर निवडणूकीत बदला घ्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

पटोले म्हणाले की, विधान परिषदेची निवडणूक एकजुटीने लढून जिंकू आणि विरोधकांची हवा काढून घेऊ. या निवडणुकीत महायुतीचा फुगा सुशिक्षितांनी फोडला तर आगामी निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल म्हणून ही निवडणूक वेगळी आहे. मुंबईतील दोन जागा, नाशिक व कोकण या चारही मतदार संघात महाविकास आघाडी एकदिलाने निवडणूक लढत आहे. या निवडणुकीत धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

राज्यात बेरोजगारीची संख्या मोठी आहे पण सरकार मात्र नोकर भरती करत नाही. महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झाले आहे. गाझा मध्ये सुरु असलेले युद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थांबवले असा दावा करतात पण देशातील पेपरफुटी मात्र मोदी थांबवू शकत नाहीत. नीट परिक्षेतील पेपरफुटीमुळे लाखो मुलांचे भवितव्य अंधारात नेण्याचे पाप भाजपा सरकारने केले आहे, असे नाना पटोले म्हणाले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!