अपक्ष उमेदवार निमकर यांचा डावखरे यांचा सवाल
मिलिंद माने
महाड : कोकणातील पदवीधरांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आजही त्यांच्या समस्या कायम आहेत. गेली दहा वर्ष पदवीधरांच्या जीवावर आमदार झालेल्या निरंजन डावखरे यांनी पदवीधरांचे प्रश्न कधी जाणून घेतले आहेत का? असा सवाल अपक्ष उमेदवार निमकर यांनी करून कोकणातील पदवीधरांच्या आणि कोकणातील प्रत्येक तालुक्याच्या विकासात्मक कामासाठी आपण उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.
26 जून रोजी होत असलेल्या कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार नागेश किसनराव निमकर यांनी आपल्या प्रचारफेरी दरम्यान महाडमध्ये आले असता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाडमधील पदवीधर मतदारांच्या भेटी घेवून समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी गेली दहा वर्ष पदवीधरांच्या बळावर आमदार म्हणून काम करत आहेत, त्यांनी या मतदारसंघात निवडून गेल्यानंतर मतदार संघातील पदवीधरांच्या समस्या जाणूनच घेतलेल्या नाहीत तसेच त्या सोडवलेल्या देखील नाहीत. यामुळेच येथील पदवीधरांच्या समस्या आजही कायम असल्याचा आरोप निमकर यांनी केला.
कोकण पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार नागेश निमकर यापुढे बोलताना त्यांनी किल्ले रायगड आणि महाड या दोन ऐतिहासिक स्थळांवर ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही यामुळे कोकणातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध झालेला नाही. या ठिकाणी पर्यटनात्मक उपाययोजना सरकारने करायला पाहिजे होत्या. मला महाडवासियांनी आणि कोकणवासीयांनी निवडून दिलं तर मी प्रथम रायगडला नतमस्तक होऊन रायगडचा कसा विकास होईल याचा विचार करणार आहे.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाने महाड तालुका जगामध्ये कसा पोहोचेल या दृष्टीने मी मेहनत घेणार आहे. महाडमध्ये येणाऱ्या पुरामुळे तसेच झालेल्या महामार्गाच्या भरावामुळे स्थानिक लोकांच्या हातातील उद्योग बंद पडले आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये विशिष्ट मक्तेदारी सुरू आहे. यामुळे पदवीधरांच्या हाताला काम नाही. औद्योगिक क्षेत्राचा विकास झाला तर स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी आपला पुढाकार असेल असेही निमकर यांनी सांगितले.
कोकणात शेतीपूरक व्यवसाय आणि लघुउद्योग युवकांच्या हातात मिळाले तर मुंबई आणि मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर थांबणार आहे. मात्र, त्यादृष्टीने सत्ताधाऱ्यांनी कधी विचारच केलेला नाही. कोकणामध्ये नॉन पॉल्युशन कंपन्या आणल्या गेल्या तर इथेच रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले. नागेश निमकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये जवळपास तीसहून अधिक मुद्दे समाविष्ट केलेले आहे. या मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न सरकारी नोकरांना भेडसावणारे प्रश्न पदवीधरांना अपेक्षित कामे आणि त्याचबरोबर कोकणामध्ये कोणकोणते प्रकल्प राबवले गेले पाहिजे याचा समावेश करण्यात आलेला आहे. मुंबई-गोवा महामार्गामुळे कोकणातील नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. हे नुकसान भरून काढायचे असेल तर त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न आतापर्यंत राज्यकर्त्यांनी आपल्याला दाखवले आहे. मात्र, प्रदूषित कंपन्या आणून तसेच मोठमोठे प्रकल्प आणून निसर्गाचे हानी केलेली आहे. त्यामुळे कोकणाला पूरक असे उद्योग आणि पर्यटनात्मक विकास झाल्यास कोकणचा कॅलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी कोकणाला अभ्यासू आमदारांची गरज आहे असा सणसणीत टोला देखील लगावला.