• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वेळास-सर्वा मार्गावर दरडींचा धोका!

ByEditor

Jun 21, 2024

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वेळीच सतर्क होण्याची गरज

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यात मंगळवारपासून मुसळधार पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे वेळास-सर्वा मार्ग सद्या धोकादायक बनला आहे. कारण गतवर्षी दरड प्रवण क्षेत्र बनलेल्या या मार्गावर यावर्षी देखील दरड कोसळण्याची भीती प्रवाशांमध्ये कायम आहे.

वेळास-सर्वा हा रस्ता समुद्रकिनारी मार्गाने जोडला आहे. येथील समुद्राला भरती किंवा अतिवृष्टी झाल्यास या मार्गावरील डोंगरांना मोठा फटका बसतो. यामुळे मागील वर्षी दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळच्या अतिवृष्टीत डोंगरातील मोठा ओसरा दगडांसह खाली रस्त्यावर आल्याने वाहतूक खोळंबली व वाहनचालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागला.

सद्या या तीन दिवसात सतत पडणाऱ्या पावसामुळे वेळास गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आदगाव व वेळासच्या मध्यभागी पथोली या ठिकाणी अचानक दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मुसळधार पाऊस व त्यात पोखरलेले डोंगर त्यामुळे मातीचा ढिगाऱ्यासह दगड रस्त्यावर येत आहेत. या घटने दरम्यान येथून कोणतेच वाहन गेले नसल्याने अनुचित प्रकार टळत आहेत. मात्र, याबाबत येथील प्रवाशांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे समस्या मांडून देखील काहीच उपयोग झाला नाही. संभाव्य धोका पाहता या कडे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोणतीच पूर्व तयारी वा खबरदारी घेत नसल्याचे समोर येत आहे.

दोन दिवस अतिवृष्टीने या मार्गावरील धोका वाढत आहे. याकडे संबधित खात्यांनी आपापली जबाबदारी ओळखून तिथे कोणताही अपघात होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यावी व या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक प्रवाशी करत आहेत.

वेळास-सर्वा मार्गावर गेल्यावर्षी खचलेल्या डोंगरातील लहान-मोठ्या दरडी सद्या रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे येथील प्रवास आम्हाला धोकादायक बनला आहे. तालुका प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून प्रवास सुखकर करावा.

-धवल तवसाळकर,
स्थानिक रहिवाशी.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!