क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होत असलेली महाराष्ट्र प्रीमियर लिग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीच्या दुसरा पात्रता फेरीचा सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स ह्या दोन संघांमध्ये शुक्रवारी पुणे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. ह्या सामन्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व त्यांच्या हस्ते सामन्याची नाणेफेक करण्यात आले.

दिनांक २ जूनपासून सुरू असलेली एमपीएल क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. अंतिम सामन्यासाठी रत्नागिरी जेट्सचा संघ दिमाखात दाखल झाला असून दुसरा पात्रता फेरीचा सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स संघांमध्ये झाला. ह्या सामन्यातील विजेता संघ शनिवारी २२ जून रोजी रत्नागिरी जेट्स बरोबर अंतिम सामन्यात भिडणार आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सन्मान दिल्याबद्दल संपूर्ण रायगड जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.