विकासाच्या दृष्टीने नव्याने उभारी कधी मिळणार?
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या दिवेआगर पर्यटन स्थळाला विकसित करण्यासाठी नेहमी पाठपुरावा करण्यात येतो. मात्र, येथील अंतर्गत रस्त्यांचा परिपूर्ण विकास होणे गरजेचे असून, लोकप्रतिनिधींकडून दूरदृष्टीने पर्यटनाची संस्कृती विकसित करायला हवी अशी मागणी दिवेआगर वाशियांकडून होत आहे.

निळाशार नितांत स्वच्छ समुद्र किनारा असलेलेल शहर अशी दिवेआगरची खास ओळख आहे. त्यामुळे वर्षभर स्वच्छंद फिरण्यासाठी देशी विदेशी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. मात्र, पावसाळी समुद्रकिनारी जाणाऱ्या रस्त्यावर पाणी भरल्याने ये- जा होत करीत असताना पर्यटक व स्थानिकांना चिखलातून चालावे लागते.

दिवेआगर गावातील अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरण यंदा नव्याने करण्यात आले. पर्यटनातून रोजगाराची संधी असणाऱ्या दिवेआगर क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. मात्र, गावाच्या प्रवेशा जवळ असलेल्या आदर्श सांसद गल्ली क्र 1 च्या मार्गावर समुद्रकिनारी जाणाऱ्या रस्त्यावर गेली पाच ते सहा वर्ष पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील सकल भागात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचत आहे.
येथील रस्त्याची खोली जास्त असल्याने पावसाचे पाणी साचले जाते. सद्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच चांगला दर्जेदार उंच रस्ता होऊन ही समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा सुरू आहे.
-सिध्देश कोजबे,
सरपंच दिवेआगर.