प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-ब, गट-क आणि गट–ड या प्रवर्गातील कंत्राटी तत्वावर दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवा समायोजन करून कायम सेवेत घेण्याची तरतूद केलेली आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये दहा वर्षे निरंतर उत्कृष्ट आपात्कालीन सेवा देऊन सुद्धा १०८ रूग्णवाहिका चालकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रुग्णवाहिका १०८ चालकांनी गुरुवारपासून आझाद मैदान, मुंबई येथे ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण सुरू केले आहे. २६ जानेवारी २०१४ पासून महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा १०८ रूग्णवाहिका हा प्रकल्प शासनाने BVG इंडिया प्राय. लिमिटेड या कंपनीला दिला आहे.

या प्रकल्पामध्ये हे वाहनचालक मागील दहा वर्षापासून कर्तव्य बजावत आहेत. कोविड-१९ सारख्या वैश्विक महामारीमध्ये स्वतःच्या जीवाची व परिवाराची परवा न करता निरंतर जनसेवेसाठी रात्रं-दिवस कर्तव्य पार पाडलेले आहे. तसेच अपघात, विषबाधा, सर्पदंश, हृदयविकार, प्रसूती, महापूर, आग लागणे, दरड कोसळणे अशा सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती व आपात्कालीन स्थितीमध्ये १०८ रुग्णवाहिका चालकांनी नेहमी फ्रंट लाईनला येऊन काम केले आहे, तसेच राजकीय जनसभा, यात्रा, व्हीआयपी दौरा, धार्मिक तथा शासकीय उत्सव-महोत्सव आणि अधिवेशन इत्यादी मध्ये सुद्धा २४ ते ४८ तास सतत त्यांनी सेवा देऊनही सरकार त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत नाही.
महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-ब, गट-क आणि ग-ड या प्रवर्गातील कंत्राटी तत्वावर दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवासमायोजन करून कायम सेवेत घेण्याची तरतूद केलेली आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये दहा वर्षे निरंतर उत्कृष्ट आपात्कालीन सेवा देऊन सुद्धा १०८ रूग्णवाहिका चालकांचा कोणत्याही प्रकारचा विचार केला गेलेला नाही. त्यामुळे सेवेवर शासनाने केलेले दुर्लक्ष आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी ‘आझाद मैदान येथे गुरुवार, दि. २७ जून ते १२ जुलै दरम्यान ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागण्या
१) १०८ रुग्णवाहिका चालकांना कायम शासन सेवेत समाविष्ठ करावे.
किंवा
२) कंत्राटीदाराच्या कंत्राटी पध्दतीमध्ये न ठेवता वेगळ्या महामंडळाची स्थापना
करून १०८ रूग्णवाहिका चालकांना खालीलप्रमाणे हक्क मिळवून द्यावेत.
अ) समान काम समान वेतन देण्यात यावे.
ब) कर्तव्याच्या तासिका ८ तास कराव्यात. (२४४८)
क) किमान १२ किरकोळ व १५ वैद्यकीय वार्षिक पगारी रजा देण्यात याव्यात.
ड) सर्व चालकांचा शासनाकडून कर्मचारी आरोग्य व अपघात विमा काढण्यात यावा.