विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची नवीन डेडलाईन पुन्हा डिसेंबर २०२४ पर्यंत गेली असून अशा कितीतरी तारखा दिल्या गेल्या परंतु महामार्गाचे काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. काम होईल तेव्हा होईल मात्र पहिले मार्गाचे खड्डे भरा अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गाकडुन व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील चौपदरीकरणाच्या कामाविषयी विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, या महामार्गासाठी नवीन ठेकेदार नेमले असुन हे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. परंतु या फक्त वल्गना असल्याचे बोलले जात आहे, कारण अशा अनेक दिलेल्या तारखा फेल गेल्या असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वरसगांव, आंबेवाडी बाजारपेठ व खांब नाका येथे रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले असुन हे खड्डे दररोज भरण्याचा प्रयत्न केला जात असून खड्डे काही भरले जात नाहीत. काल भरलेला खड्डा दुसऱ्या दिवशी तसाच दिसून येत आहे. याला कारण सुरु असलेले निकृष्ट दर्जाचे आहे. या खड्ड्यामुळे दररोज अपघात होत आहेत. आंबेवाडी नाक्यावर तर भयानक परिस्थिती असून येथील खड्डे व चिखल यामुळे वाहन चालकांसह, प्रवासी वर्ग व पादचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम १७ वर्षांपासून सुरु असुन या कामात कोणतीही प्रगती नाही. यासाठी शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले, किती ठेकेदार आले किती गेले परंतु या कामात कोणतेही क्वालिटी नाही, बनविलेल्या साईडपट्टया व सिमेंटकाँक्रीट रस्ते निकृष्ट दर्जाचे असून याला कारणीभूत शासनाचा ठेकेदारावर नसलेला वचक. यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल परंतु महामार्गाला पडलेले खड्डे पहिले भरले जावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.