अनंत नारंगीकर
उरण : करंजा हद्दीतील वीजग्राहक हे विजेच्या बिलाची रक्कम भरण्यास सातत्याने पुढे असतानाही या परिसरातील रहिवाशांना करण्यात येत असलेला विद्युत पुरवठा हा महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे रात्री अपरात्री वारंवार खंडित होत आहे. तरी महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी सदर समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांच्या उपस्थितीत करंजा गावातील नागरिकांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी माहिती देताना सांगितले की, उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत १९७० साली शासनाच्या एमएसईबीकडून रहिवाशांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे सदर विद्युत वाहक तारा, लोखंडी पोल हे जिर्ण झालेले असल्याने वारंवार विद्युत वाहक तारा तुटल्या च्या घटनेत वाढ होत आहे. तसेच सडलेले लोखंडी पोल पडून अपघात होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.परंतु वारंवार मागणी करूनही महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दुर्लक्ष करत आहेत.
सध्या पावसाळा सुरू झाल्यानंतर महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार न घेतल्याने विज पुरवठा खंडित होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्याचा त्रास हा रहिवाशांना, विद्यार्थ्यांना, रुग्णांना, व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. तरी महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी करंजा गावातील रहिवाशांचा अंत न पाहता विज समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करंजा गावातील नागरिकांनी महावितरण कंपनीचे उप अभियंता महेश जाधव आणि राहुल शिंदे यांच्याकडे शुक्रवारी (दि. ५) दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे. यावेळी करंजा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कल्पेश थळी, परेश म्हात्रे किशोर म्हात्रे, महींन घरत उपस्थित होते.