अशिक्षित डॉक्टरला सांगितले टाके काढायला व स्लॅब लावायला
डॉ. दिग्विजय पाटील यांची उडवाउडवीची उत्तरे
सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पाटील यांनी व्यक्त केला संताप
अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. शस्त्रक्रिया झालेले पेझारी येथील चंद्रकांत पाटील (वय ६५) टाके काढण्यासाठी आले असता डॉ. दिग्विजय पाटील यांनी अगोदर एक्सरे काढण्यासाठी सांगितले, त्याप्रमाणे रुग्णाचे एक्सरे काढून दाखवले असता उपस्थित रेसिडेंट डॉ. दिग्विजय पाटील यांनी अशिक्षित महिला डॉक्टरांना टाके काढण्यास सांगितल्याने पेझारी येथील रुग्णाला घेऊन आलेले सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यांना तिथे उपस्थित प्रथम तपासणी करण्याऱ्या डॉ. दिग्विजय पाटील व त्यांचे सहकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत ‘तुम्हाला काय करायचे ते करा, कोणाला सांगायचे ते जाऊन सांगा’, असे बोलत जोरदार हुज्जत घातली. त्यानंतर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे टाके रागारागाने काढत त्या जखमेवर औषध (मलम) न लावता फक्त पट्टी गुंडाळली व डॉक्टर निघून गेले. याबाबत इतर उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी येथील डॉक्टर गरीब रुग्णांच्या बाबतीत असे वारंवार वागत असल्याचे सांगत डॉक्टरांच्या अश्या प्रकारे वागण्यावर संताप व्यक्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेझारी येथील चंद्रकांत पाटील (वय ६५) या रुग्णाच्या पायावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. आशिष मिश्रा यांनी १२ दिवसानंतर टाके काढण्यासाठी बोलावले होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सोमवार, दि. ८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता टाके काढण्यासाठी ओपीडी येथील तपासणी करण्यासाठी असलेल्या खोलीतील डॉक्टरांना भेटण्यासाठी आले असता डॉ. दिग्विजय पाटील हे तब्बल एक तास उशिराने म्हणजेच पाच वाजता आले. त्यावेळी रुग्णाने तपासणी करून टाके काढण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. यावर डॉक्टरांनी प्रथम रुग्णाचे एक्सरे काढून आणण्यास सांगितले, त्यानंतर रुग्णाचे एक्सरे काढून पुन्हा दाखवले असता तपासणीस डॉ. दिग्विजय पाटील यांनी इतर अशिक्षित महिला डॉक्टरला सर्जिकल ब्लेडने रुग्णाचे टाके काढून स्लॅब लावण्यास सांगितले व रुग्णास मलमपट्टी करण्यासाठी दुसऱ्या खोलीत पाठवून निघून गेले. मात्र, रुग्णाला खोलीत आणले असता त्या अशिक्षित महिला डॉक्टरने मला टाके व स्लॅब लावण्यास येत नसल्याचे सांगितले. यावर रुग्णाला घेऊन आलेले सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पाटील यांनी त्या महिला डॉक्टरांना ‘हे टाके काढण्यास व स्लॅब लावण्यास तुम्हाला येत नसल्यास तुम्ही ही जबाबदारी का घेतली? असे सांगत आक्षेप घेतला व तेव्हा त्या महिला डॉक्टरांनी सदर निवासी डॉक्टरांना फोन करून बोलाविले.
त्यानंतर आलेल्या डॉ. दिग्विजय पाटील यांना ‘हे टाके काढणे तुमचे कर्तव्य असल्याने तुम्ही स्वतः टाके व मलमपट्टी करा, असे सांगितले. त्यावेळी डॉ. दिग्विजय पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पाटील यांच्या सोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ‘तुम्हाला काय करायचे आहे ते करा, कोणाला सांगायचे ते जाऊन सांगा, आमचे कोणीच वाकडे करू शकत नाही’ असे उद्धटपणे सांगितले, तसेच त्या रुग्णाचे टाके रागारागाने काढत जखमेवर औषध (मलम) न लावता फक्त पट्टी गुंडाळली आणि निघून गेले. यावेळी रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण व त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. त्यांनी सदर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या वागण्यावर संताप व्यक्त केला. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक नितीन देवमाने यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. तेव्हा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मुंबई येथील मंत्रालयात महत्त्वाच्या बैठकीस आलो असल्याचे सांगत आल्यानंतर संबंधित डॉक्टरवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन प्रतिक पाटील यांना दिले.
याबाबत प्रतिक पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले की, मी फक्त या डॉक्टरांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती. माझे कोणतेही वैर नाही, परंतु या डॉक्टरांचे असे वागणे आम्हाला बिलकुल आवडले नाही. त्यांच्या अश्या वागण्याने आमचे मन फार दुखावले आहे. यापूर्वी या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या विविध तालुक्यातील विविध गावांतील रुग्णांची आम्ही मनोभावे सेवा केली आहे. याठिकाणी असलेल्या विविध विभागातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आदींनी आम्हाला प्रत्येक वेळी चांगल्या प्रकारे मदत केली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, म्हसळा, माणगांव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन अश्या इतर सर्व तालुक्यातील रुग्ण मोठ्या आशेने लांबून येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात, मात्र येथील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) डॉक्टर सकाळी नऊ वाजता न येता अकरा वाजता येतात आणि दुपारी चार वाजता न येता संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजता येतात. तसेच आल्यानंतर काही वेळ थांबून निघून जातात. या डॉक्टरांकडे उपचारासाठी लांबून आलेल्या रुग्णांची हेळसांड होते, हे योग्य नाही. डॉक्टरांनी वेळेत येऊन लांबून आपला झालेला आजार बरा करण्यासाठी आलेला रुग्ण तुमच्याकडे मोठ्या आशेने येत असतो, पण इथे आल्यानंतर जर त्या रुग्णांची अशी हेळसांड होत असेल तर हे योग्य नाही. बाह्यरुग्ण विभागाचे नियम व कर्तव्य पार न पाडणाऱ्या या निवासी डॉक्टरांना रुग्णांची सेवा करायला जमत नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे, अशा उर्मट व उद्धटपणे वागणाऱ्या डॉक्टरांवर जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यमंत्री, आमदार महेंद्र दळवी, खासदार सुनील तटकरे यांना लवकरच पत्र देऊन संबंधित डॉ. दिग्विजय पाटील व त्यांचे सहकारी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे प्रतीक पाटील यांनी सांगितले.