प्रतिनिधी
रायगड: मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून, तीन दिवस रोज चार तास महामार्ग बंद ठेवला जाणार आहे. कोलाड जवळील पूई येथे पुलाच्या कामानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. 11 ते 13 जुलै दरम्यान सकाळी आणि दुपारच्या वेळेत महामार्गावर ब्लॉक घेतले जाणार आहेत. आगामी काळात येणाऱ्या गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागू नये यासाठी प्रशासनाने ऐन पावसाळ्यात महामार्गावरील पुलाचे काम हाती घेतले आहे. कामानिमित्त ठराविक वेळेत महामार्ग बंद ठेवला जाणार असल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी मुंबई-गोवा महार्गावरील वाहतूकीबाबत सुचना जारी केली आहे. त्यानुसार, कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रशासनाने तातडीने हाती घेतले आहे. कोलाड जवळील म्हैसदरा नदीवर नवा पुल बांधण्यात येत आहे. त्यासाठी ५ गर्डर टाकण्यात येणार आहेत. गुरुवार ११ जुलै ते १३ जुलै असे सलग तीन दिवस हे गर्डर टाकण्याचे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या काळात बंद राहणार असून प्रवाशांना या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
- पर्यायी मार्ग कोणते?
- वाहनचालकांना वाकण–पाली–भिसेखिंड–रोहा, कोलाड मार्गे मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.
- वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव येथून मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.
- खोपोली – पाली – रवाळजे – निजामपूर – माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्ग असा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.