मिलिंद माने
महाड : महाड रायगड रोडवरील लाडवली गावाजवळील नव्याने उभ्या राहत असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने काढलेल्या पर्यायी मार्गावर पाणी आल्याने पर्यायी मार्ग बंद होऊन 25 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे
महाड रायगड रस्त्याच्या काँक्रीट करण्याचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. जागोजागी अर्धवट अवस्थेत ठेवलेल्या या कामामुळे आधीच रायगडकडे जाणाऱ्या 25 गावातील ग्रामस्थांना दररोज खड्ड्यातून व अपघातांचा सामना करीत अंतर पार करावे लागत आहे. त्यातच लाडवली जवळील मांडले नदीवरील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे पर्यायी असणारा रस्ता तयार करण्यात आला. मात्र, रायगड खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण बघता हा पर्यायी रस्ता पावसाळा चालू झाला असताना पर्जन्यवृष्टी झाल्यास मोठ्या प्रमाणावर त्याठिकाणी पाणी साचून हा रस्ता बंद झाल्याच्या घटना पावसाळा चालू झाल्यानंतर किमान चार वेळा घडल्या आहेत.
महाड तालुक्यात आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. आज सकाळपासून तर पाच वाजेपर्यंत 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातच लाडवली जवळील नव्याने सुरु असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने ठेकेदाराने या मार्गावरील वाहतुकीसाठी पुलाच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावर पाईप टाकून त्यावर मातीचा भराव करून रस्ता तयार केला आहे. मात्र, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याचा प्रवाह बघता हा रस्ता अचानकपणे बंद होण्याच्या घटना घडत असल्याने शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या तसेच तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावरून पाणी गेल्याने जाण्यायेण्याचा संपर्क तुटतो. आज देखील दुपारी चार वाजल्यापासून या पर्यायी रस्त्यावर पाणी आल्याने या पाण्यातूनच वाहनांना आपला मार्ग काढावा लागत होता. रात्री जर मुसळधार पाऊस झाला तर हा मार्ग बंद होण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे.
महाड जवळील लाडवली येथील पर्यायी पुलाच्या जागी असणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यास त्या ठिकाणची वाहतूक दोन्ही बाजूकडून बंद करण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित नसल्याने पाण्याच्या प्रवाहात एखादे वाहन वाहत जाऊन दुर्घटना घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खाते व अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला जाग येणार का? असा सवाल विचारला जात आहे. |