अनंत नारंगीकर
उरण : लांबलेल्या पावसामुळे भात लावणीची कामे देखील यंदा उशीरा सुरू झाली आहेत. मागील दोन दिवसांपासून उरण तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात लावणीची कामे सुरु झाली आहेत. आजपर्यंत ७० टक्के लावणीची कामे पूर्ण झाली असून काही शेतकऱ्यांनी पारंपारिक भात लागवडीपेक्षा आधुनिक पध्दतीने भात लागवड करण्यावर भर दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
उरण तालुका हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. या तालुक्यातील बहुतांश लोक हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भातशेती बरोबर मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. मात्र, जेएनपीए बंदर आणि केंद्र व राज्य सरकारचे महत्त्वाचे प्रकल्प या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आल्याने या तालुक्यातील नवघर, जासई या जिल्हा परिषद मतदार संघातील बहुतांश शेतजमीनी या सिडकोने, खाजगी विकासकांने संपादित केलेल्या आहेत. चिरनेर व चाणजे जिल्हा परिषद मतदार संघातील गावातील बहुतांश शेतकरी हे आजही आपला पारंपरिक भातशेती व मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. यावर्षी जून महिना कोरडा गेल्याने भात पेरणी बरोबर भात लावणीची कामे खोळंबली होती. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केल्याने भाताची रोपे बहरली असल्याने शेतकऱ्यांनी भात नांगरणी बरोबर भात लावणीच्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र पहावयास मिळत असून जवळजवळ ७० टक्के लावणीची कामे पूर्ण झाली आहेत.