ग्राहकांना सर्व्हिस देण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ
विश्वास निकम
कोलाड : महाराष्ट्र विद्युत महामंडळाचा कारभार आहे तरी कसा? तर कोलाड सब स्टेशनमधून कोलाड, खांब, देवकान्हे परिसरात विजेचा सावळा गोंधळ असल्याने ग्राहकांना सर्व्हिस देण्यास संबधीत खाते तसेच कर्मचारी वर्गातून चालढकल केली जाते. नियमितपणे टाळाटाळ करीत असल्याने याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता ग्रामीण भागातील वीज ग्राहकांकडून व्यक्त केला जात आहे.
कोलाड, खांब, देवकान्हे परिसरात अनेक गावे ही ग्रामीण भागात वसलेली आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नेहमीच विजेचा सावळा गोंधळ असल्याने ग्राहकांना होत असलेला वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांना रात्री अपरात्री अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे विद्युत महामंडळाच्या वतीने नेमण्यात आलेले खाजगी कर्मचारी हे देखील वेळीच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करत नसल्याने तसेच त्यांना वेळीच सेवा देत नसल्याने अधिक मोठी समस्या ग्राहक वर्गा समोर उभी राहत आहे. घरगुती वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्राहक वर्गाला सेवा देण्यात कर्मचारी यांच्याकडून टाळटाल होत आहे. संबधीत नेमणूक केलेले कर्मचारी यांना संपर्क साधला की त्याला कोणत्याही प्रकारे उत्तर दिले नाही. तसेच काही वेळेस उलटसुलट उत्तरे सुद्धा दिली जात आहेत. त्यामुळे गावागावातून वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे अथवा काम चुकारपणामुळे एकच संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
वीज बिल वेळेवर भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असा तगादा लावणारे कर्मचारी विजेच्या बिलात सर्व कर आकारणी घेतात, मग त्या ग्राहकाला समाधानकारक सुविधा देण्यासाठी अथवा सेवा देण्यास टाळाटाळ का केली जाते? यावर नियंत्रण कोणाचे? हा सवाल उपस्थित होत आहे. सेवा पुरविण्यासाठी खाजगी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र हे खाजगी कर्मचारी मनमानी पद्धतीने कामे करत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत.
संबंधीत खात्याच्या सब डीव्हिजनच्या कनिष्ठ अभियंता अथवा वरीष्ठ अधिकारी वर्गाने याकडे लक्ष केंद्रित करून येथील नागरीकांना वेळेवर सेवा देण्यासाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिक लक्ष द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थ वर्गातून केली जात आहे.
विद्युत महामंडळाकडून करण्यात येत असलेला वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मोठ्या समस्यांना गावातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. सद्या शेतीची कामे सुरू आहेत, त्यामुळे ऐनवेळी वीज पुरवठा खंडित होतो तसेच एक फेज जाणे अथवा ग्राहकांचा विद्युत खांबावरून वीज पुरवठा खंडित होणे हे प्रकार घडले जात आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे. तर याची तक्रार संबंधीत गाव पातळीवर नेमण्यात आलेल्या कर्मचारी वर्गास कळविण्यात आल्याने ते तक्रार करा असे सांगतात. तर ते आज होणार नाही नंतर करू अशी उलटसुलट उत्तरे ग्राहकास मिळत आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे हे अधिक महत्त्वाचे आहे, तरी महाराष्ट्र विद्युत महामंडळ कंपनीने असे कामचुकार कर्मचारी यांच्यावर वेळीच कारवाई करावी.
-पूजा लोखंडे
सामाजिक कार्यकर्त्या, खांब विभाग.