मिलिंद माने
महाड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला सातत्याने पुराचा फटका बसत आहे. सन 2005, सन 2016 व सन 2021 व त्यानंतर आता 2024 या पावसाळ्यात आलेला महापूर बघता खेड शहरातील व्यापारी पेठेत पुराचे पाणी आल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांचे दरवर्षी नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने चिपळूण व महाडच्या धर्तीवर खेड शहराजवळ वाहणाऱ्या जगबुडी नदीतील गाळ काढून खेडकरांची पुरातून कायमस्वरूपी सुटका करावी अशी मागणी खेडचे माजी नगराध्यक्ष व कोकणचे मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी शासनाकडे केली आहे.
खेड शहराजवळ वाहणाऱ्या जगगुडी नदीतील गाळ काढण्याबाबत वारंवार शासनाकडे ओरड करून व पाठपुरावा करून या नदीचा गाळ काढावा अशी मागणी खेडमधल्या व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत स्थानिक आमदारांनी प्रयत्न करून त्यासाठी दोन कोटी रुपये आणले. पण त्यासाठी ही अपुरी मदत असल्याने व नदीत साठलेला गाळ देखील मोठ्या प्रमाणात आहे, त्यासाठी स्वयंसेवी संस्था यांनी या कामी पुढाकार घ्यावा अशी मागणी खेडचे माजी नगराध्यक्ष व मनसे नेते वैभव खेडेकर यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड व रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या ठिकाणी देखील सातत्याने पावसाळ्यात पूर येत होता. त्या ठिकाणी शासनाने नदीतला गाळ काढण्याबाबत ज्याप्रमाणे निधीची तरतूद केली त्याचप्रमाणे खेडमधून वाहणाऱ्या जगबुडी नदीमध्ये साठलेला गाळ काढण्याबाबत शासनाने निधीची तरतूद करावी अशी मागणी देखील त्यांनी शासनाकडे केली आहे. जेणेकरून खेडमधील व्यापारी व नागरिकांचा दरवर्षी पुराच्या पाण्याने होणाऱ्या नुकसानापासून बचाव करता येईल. याबाबत खेड शहरातील सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याबाबत ते पुढाकार घेणार असल्याचे सांगून याबाबत शासनावर दबाव टाकून जगबुडी नदीतील गाळ काढण्याबाबत शासनाकडे निधीची मागणी करणार असल्याचे मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी सांगितले.