• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मागणी नसताना मुंबईतल्या रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, मात्र उरणकरांच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष!

ByEditor

Jul 17, 2024

घन:श्याम कडू
उरण :
मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकांची जुनी नावे बदलण्याची शिफारस करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकांची नावे बदलली जावीत अशी मागणी करणारे आंदोलन वगैरे कुणीही केलेले नसताना ती बदलण्याची शिफारस केली जात आहे. मात्र, उरण तालुक्यातील अनेक रेल्वे स्थानकांना दिलेली चुकीची नावे बदलण्यात यावीत अशी मागणी करणारी अनेक आंदोलने उरणकरांनी केली मात्र, त्याकडे राज्य शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यापैकी कोणीही लक्ष देत नसल्याची खदखद उरणकरांमध्ये आहे.

उरणच्या द्रोणागिरी रेल्वे स्थानकाला स्थानिक गाव असलेल्या बोकडविरा गावाचे नाव देण्याची मागणी आहे. नवघर गावाजवळ असलेल्या रेल्वे स्थानकाला न्हावा शेवा असे नाव देऊन रेल्वेने स्थानिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. रांजणपाडा गावाच्या नव्हे तर सर्वाधिक मौजे धूतूम गावाच्या जमिनीवर वसलेल्या रेल्वे स्थानकाला देखील रेल्वेने रांजणपाडा असे नाव दिले आहे. ते बदलावे यासाठी मोठ मोठी आंदोलने गावकऱ्यांनी केली मात्र, आजतागायत त्यावर रेल्वेने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

अशा स्थितीत मुंबईतील मागणी नसताना देखील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेत राज्य सरकारने तशी शिफारस देखील केली असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त स्थानिकांपर्यत पोहोचताच भूमिपुत्रांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. राज्य शासन जर मुंबईची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन तेथील स्थानकांची नावे बदलत असेल तर उरणकरांनी काय घोडे मारले आहेत? असा जळजळीत सवाल उरणच्या स्थानिक भूमिपुत्रांकडून विचारला जात आहे. द्रोणागीरीचे नाव बदलून बोकडविरा देण्यासाठी ग्रामपंचायत बोकडविराने सर्व ग्रामस्थांना घेऊन आंदोलन केले होते. नवघर असे नाव न्हावा शेवा स्थानकाला द्यावे यासाठी देखील ग्रामस्थांनी अगदी टोकाचे आंदोलन केले होते. धुतूंमसाठी देखील ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. मात्र, यापैकी कोणत्याही आंदोलनाची रेल्वेने आजतागायत दखलच घेतली नाही. त्यामुळे या मागणी असलेल्या कोणत्याही रेल्वे स्थानकांची नावे आज तरी बदलली गेलेली नाहीत. त्याचवेळी राज्य सरकारने मात्र मुंबईतल्या काही रेल्वे स्थानकांची इंग्रजांच्या काळातील नावे बदलण्यासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उरण तालुका हा महाराष्ट्रात नाही का? असा सवाल येथील नागरिक विचारू लागले आहेत.

विशेष म्हणजे राज्याच्या अधिवेशनात मुंबईतल्या काही स्थानकांची नावे बदलण्याबाबत केंद्राला शिफारस करण्याचा निर्णय घेतला जात होता. त्यावेळी उरणचे लोकप्रतिनिधी काय करत होते? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. त्यांना स्थानिकांची रेल्वे स्थानकांची नावे बदलायला हवीत ही मागणीच माहीत नाही की काय? असेही या निमित्ताने विचारले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!