सलीम शेख
माणगाव : पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांना रानभाज्यांचे वेध लागतात. गेल्या काही दिवसात कोकणात सतत पडणाऱ्या पावसामुळे रानावनात तयार होणाऱ्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहेत. या रानभाज्यांना ग्राहकांची पसंती असून मागणीसुद्धा चांगली आहे. पावसाच्या सुरुवातीलाच रानभाजी शेवळं तयार झाली असून नंतर रानावनातील झाडाझुडपात आढळणारी रानातील फळभाजी म्हणजेच करटोली होय. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करटोलीची भाजी विक्रीसाठी बाजारपेठेत येत असून यावर्षी एका किलोला २००/- रुपये एवढा भाव मिळत आहे.
आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी उत्तम असलेली करटोलीची भाजी सुरुवातीच्या पावसात मिळत असल्याने या भाजीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. खाण्यासाठी चविष्ट व रुचकर असलेली करटोलीची रानभाजी गृहिणींचीही मोठ्या प्रमाणात पसंती असते. तालुक्यातील आदिवासी महिलांना या रानभाज्या विक्रीतून चांगली कमाई होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते २० रुपये यावर्षी करटोलीची भाजी महाग झाली आहे. यावर्षी २००/- रुपये किलोने करटोलीची भाजी विकली जात आहे.
महामार्गावरील बाजारपेठांची गावे व रस्त्याच्या कडेला करटोली विक्रीसाठी स्थानिक महिला व विक्रेते बसत असून पर्यटक प्रवासी आवर्जून ही भाजी खरेदी करताना दिसत आहेत. पुढील काही दिवसच ही भाजी उपलब्ध होणार असल्याने खवय्ये करटोलीची भाजी आवडीने विकत घेत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला करटोलीची वेल उगवते. साधारणतः महिनाभरात करटोलीला फळे येतात. ही फळभाजी खाण्यासाठी अत्यंत रुचकर असल्याने ग्राहकांची चांगली मागणी आहे. यावर्षी २००/- रुपये प्रति किलोने करटोलीची विक्री केली जात आहे.
झाडाझुडपात वाढत असणारी करटोलीची वनस्पती फळे मिळवणे कष्टाचे आहे. यातून चांगली आर्थिक कमाई होत असून रोजगार मिळत आहे.
-सोनी पवार,
भाजी विक्रेत्या.
पावसाळ्यातील रानभाज्या खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व रुचकर असतात. करटोलीची भाजी तर आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी अशी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही दिवसच ही भाजी मिळत असल्याने आवर्जून आम्ही ही भाजी खरेदी करतो.
-कल्पना ठाकुर
गृहिणी.