अनंत नारंगीकर
उरण : जेएनपीए रस्त्यावर अवैध वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर जेएनपीए आता कडक धोरण राबविणार असून या वाहनधारकांचा जेएनपीएतील परवानाच रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जेएनपीएच्या जागांवर जी अवैध बांधकामे झाली आहेत ती बांधकामे देखिल १५ ऑगस्टनंतर तोडण्यात येतील असे जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना उन्मेष वाघ यांनी जेएनपीए परिसरात पार्किंगची व्यवस्था असताना देखिल काही वाहने जाणूनबूजून रस्त्यावर उभी करण्यात येतात, त्यामुळे वाहतूकीला अडथळा येतो आणि जेएनपीएची प्रतिमा मलिन होते. जेएनपीएने नव्याने अनेक सुसज्ज रस्ते बनविले आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमची दुर झाली आहे. जेएनपीएने अवजड वाहने पार्क करण्यासाठी मोठमोठाले पार्किंग बनविलेल्या आहेत आणि त्या पार्किंगमध्ये सगळ्या सुविधा असताना देखिल काही वाहनचालक रस्त्यावर वाहने उभी करत आहेत. त्याचप्रमाणे जेएनपीएच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकामे केली आहेत आणि त्या ठिकाणी अवैध धंदे होत असल्यामुळे ही अतिक्रमणे लवकरच तोडण्यात येणार असल्याची माहिती उन्मेष वाघ यांनी दिली.
जेएनपीए बेलपाडा गावाच्या पाठीमागून ते अटल सेतूपर्यंत एक नवा पर्यायी रस्ता बनविणार असून त्यामुळे जुन्या मार्गांवरील वाहतूक कमी होणार आहे. जेएनपीए २५ एकर जागेवर शेती मालावर प्रक्रिया केंद्र उभारणार असून या भागातील निर्यातक्षम शेती मालावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करणार आहे. यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आदी राज्यांतील शेती उत्पादनाचा अभ्यास केला असल्याचेही उन्मेष वाघ यांनी सांगितले. यावेळी जेएनपीए बंदराचे अधिकारी उपस्थित होते.