साकव नसल्याने शेलू ग्रामपंचायत हद्दीतील वाघीणीची वाडीतील विद्यार्थ्यांचा पाण्यातून प्रवास
दुर्घटना घडल्यावर प्रशासन दखल घेणार का?
गणेश पवार
कर्जत : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेलू ग्रामपंचायत हद्दीतील वाघीणीची वाडी येथील ग्रामस्थांना व शाळेच्या विद्यार्थ्यांना बेडीसगाव व वाघीणीची वाडी दरम्यान असलेल्या ओढ्यावर साकव नसल्याने आपला जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या घटनेची प्रशासन दखल कधी घेणार? असा सवाल मात्र उपस्थित होत आहे.

शेलु ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बेडीसगाव येथील सह्याद्रीच्या कुशीत डोंगरभागात वसलेली वाघिणीची वाडी असुन, या वाडीमध्ये आदिवासी ग्रामस्थांची ६० ते ६५ घरांची वस्ती आहे. वाघिणीच्या वाडीची लोकसंख्या ही साधारण १५० ते १७५ असुन, येथे रायगड जिल्हा परिषदेची इयत्ता १ ते ५ वीपर्यंत शाळा असुन, पुढील शिक्षणाकरीता येथील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मोलमजुरी व कामासाठी वांगणी, शेलू, नेरळ, कर्जत, बदलापूर, आदी शहरात जावे लागत आहे. तर वनविभागाच्या येणाऱ्या अडचणीमुळे येथील ग्रामस्थांची रस्त्याची मागणी ही लालफितीत अडकली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून वाडीला रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी यांना वाघिणीची वाडी ते बेडीसगाव हे डोंगर भागातील अंतर पायपिट करुन जावे लागत आहे. तसेच वाघिणीची वाडी व बेडीसगाव दरम्यान असलेल्या ओहळावर साकव नसल्यामुळे येथील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांना या ओहळातून आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. हि आजची परिस्थिती आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून वाघीणीच्या वाडीचा रस्ता व ओहळावरील साकवाकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष पाहाता एखादी दुर्घटना घडल्यावरच रस्ता व साकवच्या समस्यांची प्रशासन दखल घेणार का? असा सवाल मात्र उपस्थित होत आहे.
देश स्वतंत्र होऊ बराच काळ होऊन गेला मात्र आमच्या वाडीला जाणारा रस्ता नसल्याने आमच्या ग्रामस्थांचे व मुलाबाळांचे पायपीटी करण्यात आयुष्य गेले. ओहळावर साकव नसल्याने आम्हाला व आमच्या मुलांना पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यावर पूरपरस्थिती असलेल्या पाण्यातून जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जर या पाण्यात एखादा ग्रामस्थ किंवा शाळेतील विद्यार्थी वाहून जाऊन जीवीतहानी झाल्यास याला जबाबदार कोण? प्रशासन की सरकार?
-विनोद ढुमणा
ग्रामस्थ, वाघिणीची वाडी
वाघिणीच्या वाडीच्या रस्त्त्याचा प्रस्ताव हा कर्जत-खालापूर विधानसभेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी शासनाकडे पाठवला आहे. सदर रस्त्यासाठी वन विभागाच्या येणाऱ्या अडचणी दुर करून या रस्त्याच्या कामाला मान्यता मिळून लवकरात लवकर रस्त्याचे कामाला सुरवात केली जाईल. आमदार महेंद्र थोरवे हे या रस्त्याच्या मंजूरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. ओहळावर साकव नसल्याने ग्रामस्थ व विद्यार्थी यांना जो जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे ही वाईट बाब असुन, या संदर्भात आम्ही आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन सदर साकव मंजूर करण्यासाठी निवेदन देऊन विनंती करू.
-सरिता विलास डुकरे
सदस्या, ग्रुप ग्रामपंचायत शेलु