वारंगीमध्ये होणाऱ्या प्रकल्पाबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ?
ग्रामस्थांचा विरोध परंतु ग्रामपंचायतीची मात्र ना हरकत!
मिलिंद माने
महाड : सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड खोऱ्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अदानी ग्रीन एनर्जीने कब्जा केला असून वारंगी गावाजवळ होत असलेल्या प्रकल्पाबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ आहे कि अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहे? याबाबत स्थानिक नागरिकांना शंका निर्माण झाली आहे. यामुळे या प्रकल्पाला अनेक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असला तरी ग्रामपंचायतीकडून मात्र विरोध होण्याआधीच ना हरकत दाखला देण्यात आला असल्याने अदानीने रायगड खोऱ्यात हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे यातून स्पष्टपणे दिसत आहे.

महाड तालुक्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी स्थानिक नागरिकांच्या शेकडो एकर जमिनी काळ जलविद्युत प्रकल्पामध्ये गेल्या आहेत. हा प्रकल्प आजही धुळखात पडून आहे. प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन देखील झालेले नाही. जमिनींचे संपादन झालेले असले तरी आजही स्थानिक ग्रामस्थ छत्री निजामपूर, वारंगी, वाघेरी या गावातच राहत आहेत. हा प्रकल्प पूर्ण झालेला नसतानाच आणखी एका प्रकल्पाची कुणकुण स्थानिक ग्रामस्थांना लागली आहे. वारंगी गावाच्या वरील बाजूस जमिनीतील खडकाचे नमुने घेण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी हे नमुने घेण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता तयार करताना डोंगरावरील झाडे देखील तोडण्यात आली. याबाबत स्थानिक ग्रामस्थ राघू तांबटकर यांनी विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. मुळातच या परिसरात नक्की कोणता प्रकल्प होत आहे याबाबत स्थानिक ग्रामस्थांना कोणतीच कल्पना नाही. नमुने घेणाऱ्या कंपनीच्या लोकांनी देखील ग्रामस्थांना कोणतीच माहिती न देता काम सुरू केले आहे. सदर काम हे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे सुरू असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

ग्रामपंचायत वारंगी यांनी वारंगी गाव हद्दीतील सर्वे नंबर ३४/७, २९९ ब व ३०/१, २८/१, ६०/१, २७ या जागेमध्ये पी.एस.पी. विकसित करण्याकरता ग्रामपंचायतीची कोणतीही हरकत नसल्याचा दाखला यापूर्वीच दिला गेला आहे. ग्रामपंचायतीने दाखला देताना मात्र तारखेचा उल्लेख केलेला नाही. यामुळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कंपनी प्रशासनामध्ये नक्की काय चर्चा झाली याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा निर्माण झाली आहे. अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीने पीएसपी प्रकल्पासाठी वारंगी गाव हद्दीमध्ये भू-सर्वेक्षण करण्यासाठी सहमती मिळावी अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतीला दिनांक २/१२/२०२२ आणि ८/२/२०२४ रोजी देण्यात आले होते. या जमिनीमध्ये बोअर आणि ड्रिलिंग करून खडकाचे नमुने घेतले जात आहेत. मात्र, या कामावर ग्रामस्थांनी हरकत घेतली होती. कोकण विभागीय आयुक्तांनी देखील रायगड जिल्हाधिकाऱ्यांना या तक्रारीची दखल घेण्यास कळवले होते. मात्र, अद्याप कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. राणी एनर्जी या कंपनीने हे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केल्याचे राघू तांबटकर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचे काम या निमित्ताने होत असल्याचे दिसून येत असून राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र अदानीचा उदो उदो करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वारंगी येथील अदानी ग्रीन एनर्जीला देण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने देण्याबाबत ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ना हरकत प्रमाणपत्र दिले हे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरूनच झाले नाही का? असा सवाल या परिसरातील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.