खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले निवेदन
विनायक पाटील
पेण : दहा दिवसापासून सतत पडत आसलेल्या पावसामुळे पेण खारेपाट भागातील भातशेती पाण्याखाली गेली असून शहापाडा, हेटवणे, बाळगंगा या धरणांचे पाणी सोडल्याने व सतत पडणारा पाऊस यामुळे हमरापुर विभाग, कणे. बोर्झे, वाशी,भाल शिर्की येथेल शेतात पाणी साठण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी नव्हते एवढे पाणी शेतात साठले आहे. ही बाब खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून प्रांत अधिकारी व पेण तहसीलदार यांना निवेदन देवुन सदर शेतीची त्वरीत पंचनामे करावे असे निवेदन देण्यात आले. यावेळी खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष पत्रकार प्रकाश माळी, सचिव सी. आर. म्हात्रे, समाजसेविका नंदा म्हात्रे, विजय म्हात्रे, दामोदर शेठ, खारेपाट विकास संकल्प संघटनेचे सदस्य तसेच शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा महागडे बियाणे, महागडी खते यावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्याचा खर्चही निघत नाही. दुबार पेरणी करायची झाली तर पाणी शेतीतून निघत नाही. बियाणे आणायला पैसे नाहीत आणि बियाणे पण मिळणार नाहीत. अशी परिस्थिती सध्या खारेपाट विभागातील शेतकऱ्यांची झाली आहे. मासे तलावांचे पण नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे न करता सरसकट बियाणे उपलब्ध करून द्यावेत तसेच नुकसान भरपाई द्यावी आशी मागणी संघटने मार्फत करण्यात आली.
खारेपाट विभागातील नागरिकांना वर्षाचे बारा महिने एक ना अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो. एक संकट संपले की दुसरे संकट हजर असते. याच्यावर मात करायची असेल तर आमच्या लोकप्रतिनिधीनी इथून पुढे तरी आमच्या खारेपाट विभागातील नागरिकांचा आणि या विभागाचा विकास कसा होईल असा आराखडा तयार करावा आणि आमच्याकडे कृपादृष्टी ठेवावी.
कधी खारे पाणी शेतीत येऊन शेती नापीक होते. तर कधी निसर्गाच्या ह्या अतिवृष्टीने भात शेतीचे नुकसान होते .
एकमेव कारण कांदळवन मग्रोज आणि काही ठिकाणी भरावाने खाड्या व्यापले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. नवीन उघाडीचे काम करताना सदोष काम होत आहे. भौगोलिक पाहणी न करता या उघाडी बांधत असतात त्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने पिके कुजून जातात. म्हणजे खारे पाणी, पावसाचे, धरणांचे पाणी एकत्र येते मात्र या पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
सतत पडणार्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश तलाठी यांना दिले असल्याचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी सांगितले.