• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

ByEditor

Jul 30, 2024

महामार्गवर होणाऱ्या अपघातासाठी संबंधित यंत्रणांना जबाबदार धरून कडक कारवाई करणार

रायगड : मुंबई- गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे आणि खड्डयांमुळे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील बायपास, सर्व्हीस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या जिल्हा प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री जावळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हाशल्य चिकित्सक अंबादास देवमाने, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, राष्ट्रीय महामार्ग प्रकाल्प संचालक यशवंत घोटकर उपस्थित होते.

महामार्ग प्राधिकरण आणि उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष या महामार्गची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी रायगड जिल्ह्यातील 35 ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले आहे. या 35 ठिकाणी आवश्यकते प्रमाणे तात्काळ डागडुजी, दुरुस्ती करण्याबाबत यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. प्रत्यक्ष जी कामे प्रस्तावित आहेत ती कामे पूर्ण करावीत. तसेच जी कामे प्रास्तावित नाही ती कामे प्रस्तावित करून राष्ट्रीय महामार्ग दिल्ली यांच्याकडून त्यासाठी मान्यता घेण्याची कर्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी दिले.

गणेशोत्सवादरम्यान मुंबई- गोवा महामार्गावरुन लाखो चाकरमनी कोकणात जातात. या काळात त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणे आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील कामामध्ये प्रस्तावित असलेल्या शक्य तेवढ्या मार्गाचे रुंदीकरण करुन घ्यावे. वाहतूक गतिमान होईल यासाठी खड्डे तात्काळ बुजवावे. संपूर्ण महामार्गावर दिशादर्शक बॅनर, बाण ठळक पणे लावावे. आवश्यकतेप्रमाणे ठीक ठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, गरज असलेल्या पुलावर सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्या लावाव्यात. अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेले बांधकाम साहित्य, पावसामुळे वाहून आलेली रेती तसेच दगड हटविण्याची कार्यवाही करावी. रस्ता मोकळा करण्याचे निर्देशही दिले. तसेच गणेशोत्सवादरम्यान माणगांव, इंदापूर या शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आणि महामार्ग प्राधिकरण यांनी ट्राफिक वार्डन नेमण्यात यावेत या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणानी विशेष काळजी घ्यावी.

महामार्गाच्या कामामध्ये प्रास्तावित असलेल्या सर्व सर्विस रोड, भुयारी मार्ग, साईड पट्ट्या यांचे काम प्राध्यान्याने पूर्ण करावे. सर्व संबंधित यंत्रनेने काम पूर्ण झाले की नाही याची खातरजमा करावी. महामार्गाचे काम हा जिल्हाप्रशासनाचा प्राधान्याचा विषय आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा, दिरंगाई खपवून घेतली जाणार असेही जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.

या पुढे महामार्गवर होणाऱ्या अपघातासाठी संबंधित असणाऱ्या सर्व यंत्रणाना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्याबरोबरच कडक कारवाई केली जाईल असेही जावळे यांनी स्पष्ट केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!