वेळेत सुधरा आणि शाळा स्वच्छ, आरोग्यदायी ठेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवा; मानसी दळवींचा सूचना वजा इशारा
अमुलकुमार जैन
अलिबाग : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जिल्हा रायगड शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोळघर तालुका अलिबाग जिल्हा रायगड या आश्रम शाळेमध्ये 450 आदिवासी विद्यार्थी शिकत आहेत. मुळातच परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे आदिवासी कुटूंबातील प्रत्येकाचे आई-वडील काळजावर दगड ठेवून आपल्या मुलामुलींना या आश्रम शाळेत पाठवतात. पण या आश्रम शाळेची परिस्थिती बघता मुलं शिकायला आलेत की आजाराने त्रस्त व्हायला हेच समजेनासे झाले आहे.
आज आदिवासी मुलांच्या पालकांच्या तक्रारीनुसार मानसी दळवी यांनी तातडीने कोळघर आश्रम शाळेला भेट दिली. पाहणी करतानाच सुरुवातीला शाळेतील मुख्याध्यापक हे ड्युटी सोडून बनियनवर दिसले. त्यांना शाळेची वेळ माहित नाही? त्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आल्या आहेत असे समजल्यानंतर सर्व शाळेतील अधिकारी, शिक्षक, कामगार आपापल्या कामाला लागले.
मेन गेट उघडल्यानंतर पहिल्याच रूममध्ये गेल्यानंतर सहावीची विद्यार्थिनी अंगावर चादर घेऊन झोपली असता तिच्या अंगावर माशांचे थवेच्या थवे बसले होते. ती आजारी का पडली? हे साधे तिच्या संबंधित शिक्षकांना, मुख्याध्यापकांना माहिती नव्हते. कचऱ्याने तुडुंब भरलेली खोली त्यात घाणीचे साम्राज्य, विखुरलेले ब्लॅंकेट, गाद्या आणि चादरी, स्लॅबमधून गळत असलेलं थेंब थेंब पाणी त्याच्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली होती. शौचालयामधील आणि बाथरूममधील चोकअप झालेल्या पाईपामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता, पौष्टिक आहार खोलीत घाण हे सर्व दृश्य बघून मानसी दळवी संतापल्या. त्यांनी सर्व शिक्षकांना धारेवर धरून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ही तुमची मुले असती तर तुम्ही असे वागले असता का? माझा गरीब आदिवासी नागरिक आपल्या मुलाचं कल्याण होईल या दृष्टिकोनातून आपल्या भरोशावर आपल्या मुला-मुलींना सोडून जातात पण त्या मुलांचे इथे असे हाल होतात, यात वेळेत सुधारणा करा नाहीतर तुम्हाला सर्वात मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा मानसी दळवी यांनी दिला.
मानसी दळवी विद्यार्थिनींशी बोलताना विद्यार्थिनींनी त्यांना सांगितले कि, इथे सॅनिटरी नॅपकिन आम्हाला वेळेत उपलब्ध होत नाही, त्यामुळे आम्हांला ते विकत घ्यावे लागतात. ते डिस्पोज करण्यासाठी आम्हाला जागा सुद्धा उपलब्ध नाही. पाणी नसल्यामुळे आणि पाणी मशिन बंद असल्यामुळे आम्हाला 3-4 दिवस आंघोळीपासून वंचित रहावे लागते. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या तीनही ऋतूमध्ये आम्हाला थंड पाण्यात अंघोळ करावी लागते. कधीकधी स्वतः पाणी भरावे लागते. साफसफाई करायला लागते. पण मजबुरीने आम्ही या सर्व गोष्टी करत आहोत. जेवणात पौष्टिक आहार मिळत नाही. हे सर्व बघून मानसी दळवीने विद्यार्थ्यांना धीर देत सांगितले तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला काही अडचण आल्या तर मला बिनधास्त कॉल करा. कोणतीही गरज लागल्यास मदत मागा आणि कोणतेही कृत्य घडत असे त्याची पूर्वकल्पना आम्हाला द्या असे मानसी दळवी यांनी सांगितले.
मानसी दळवी यांनी अधीक्षक, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांना वेळेत सुधरा आणि शाळा निरोगी आणि आरोग्यदायी, स्वच्छ ठेव, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवा असा सूचना वजा इशारा दिला.