नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे शासकीय अधिकाऱ्यांना दिले आदेश
विनायक पाटील
पेण : तालुक्यातील जुलै महिन्यात उद्भवलेली पूरपरिस्थितीत शेतकरी खारेपाट विभागातील शेती पूराच्या पाण्यात कुजून तब्बल पाच हजार हेक्टरच्या वर लागवड केलेल्या भातशेतीच पाण्यात कुजून नुकसान झाले. शेतकरी बांधवांना शासनाकडून तातडीची मदत मिळावी यासाठी वाशी, वढाव, कान्होबा, भाल या परिसरातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी भाजपा आमदार रवींद्र पाटील यांनी केली. त्यांच्या समवेत या पिक पहाणी दौऱ्याप्रसंगी प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर विभागातील माजी सरपंच वढाव पूजा अशोक पाटील, भाजप पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील सर, वढाव ग्रा. पं. सदस्य मितेश पाटील, कृषी सहाय्यक उपस्थित होते.

या नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार रविशेठ पाटील यांनी दिले आणि लगेच आजपासून पंचनामे करण्यास शासकीय यंत्रणेने सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी सांगितले.