रस्ते, फार्म हाऊस विकासासाठी जेसीबी व पोकलेन यंत्रसामुग्रीचा वापर ठरू शकतो घातक

महाड
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे, पालघर या पट्ट्यात पावसाळ्यात 4000 मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर डोंगर खचणे व भूस्खलन होणे व दरडी कोसळणे असे प्रकार पावसाळ्यात वारंवार घडतात. याला प्रमुख कारण रस्ते विकास व फार्म हाऊसचा विकास करणे यासाठी जेसीबी व पोकलेन यंत्रसामुग्री वापरल्याने मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात भूस्खलन होते त्यामुळे नुकत्याच झालेल्या केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाची परिस्थिती भविष्यात कोकणात उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यासह ठाणे व पालघर या जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर समुद्रकिनारी धरणे व डोंगर माथ्यावरील थंड हवेची ठिकाणे आहेत. या सर्व जिल्ह्यात रस्ते विकास, नळ पाणीपुरवठा योजना त्याचप्रमाणे शेततळे व फार्म हाऊस ह्या संकल्पनेसाठी मोठ्या प्रमाणावर डोंगराचे उत्खनन झाले आहे. हे उत्खनन होत असताना मोठ्या प्रमाणावर जेसीबी व पोकलेन ही यंत्रसामग्री वापरून अमर्याद उत्खनन करण्याचे काम शासकीय यंत्रणा असो वा खाजगी विकासक असो यांनी केले आहे. याचा परिणाम मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील इरसाळवाडी येथे झाला होता. या सारखे प्रकार महाड तालुक्यातील जुई, रोहन, कोंडीवते व दासगाव यासह पारमाची तसेच पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी, कोंडवी, कुडपण यासह दरवर्षी वाई सुरुर रस्ता तसेच वरंध घाट व नुकताच ताम्हणी मार्गे जाणाऱ्या पुणे रस्त्यावर आलेली दरड त्याच पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यातील कोल्हापूर गगनबावडा रस्ता, पाटण कराड मार्गे जाणारा पोफळी घाट या सर्व रस्त्यांवर जेसीबी व पोकलेन यंत्राचा वापर झाल्याने मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात भूस्खलन झाल्याचे उघड झाले आहे.

सततच्या पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये कित्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन काही गावे गाडली गेली आहेत. आत्तापर्यंत १५० माणसे मृत्युमुखी आणि ३०० व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग तसेच ठाणे, पालघर व सह्याद्रीच्या डोंगराच्या माथ्यावर बेसुमार वृक्षतोड आणि रस्ते विकास व फार्म हाऊस संकल्पनेच्या नावाखाली जेसीबी व पोकलेन या यांत्रिक मशनरीचा वापर झाल्याने पावसाळ्यात दरवर्षी भूस्खलन होते ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तसेच सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध व बेसुमार जंगतोडीमुळे पावसाचं पाणी अंधाधुंद वाहून कुठल्या तरी खोलगट भागात साठून जातं आणि मुरत मुरत खालच्या बाजूवर दबाव टाकत राहतं. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर तापमान वाढत जाते. पूर्वी कोकणात 30 ते 32 अंश सेल्सियस डिग्री असलेले तापमान मागील दोन वर्षात ते 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. परिणामी जमिनीवर झाडांचं छप्पर नसल्याने ओसाड झालेली जमीन अफाट तापते आणि पहिल्या पावसात त्यात भेगा पडतात. त्यावर मोठा पाऊस झाला की शेकडो, हजारो टन पाणी जमिनीत मुरतं व माती जिरून हळूहळू खाली सरकत जाते.

कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यासह समुद्र सपाटीपासून जवळ असणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील निसर्ग संपन्न असलेल्या डोंगर उतारावर व थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या डोंगर माथ्यावर फार्म हाऊस ही संकल्पना अस्तित्वात आल्याने अवाढव्य आकाराची घरे, बंगले, नागमोडी रस्ते यांची बांधकामे करताना जेसीबी व पोलकेन यंत्राचा बेसुमार वापर करून, उतारावरची माती उत्खनन झाल्याने अनेक ठिकाणचे डोंगर व टेकड्या अस्थिर झाले आहेत. माती धरून ठेवायला झाडं नसल्याने हा भाग ओसाड माळरानासारखा झाला आहे.

कोकणात पावसाळ्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते. ज्या दिवशी अचानक सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडतो तेव्हा डोंगर टेकड्यांवरील उतार यांची पाणी शोषून घेण्याची आणि ते पाणी झिरपू देण्याची नैसर्गिक प्रवृत्ती संपुष्टात आल्यावर डोंगरावरील व टेकड्यांवरील अनावश्यक पाणी जमीन सोडून देते व हे पाणी उतारावरून सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे डोंगर व टेकड्यांच्या खालील भागाकडे येते. त्यातच पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे व फार्म हाऊस संकल्पनेच्या नावाखाली वृक्षतोड झाल्याने बांधकामे अडथळे निर्माण करतात. परिणामी उतारावर जमिनीच्या पोटात प्रचंड वजनाचे अदृश्य पाणीसाठे निर्माण होतात. हे हजारो टन वजनाचे पाण्याचे अदृश्य साठे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने खाली खाली सरकताना सोबत दगड, उरली सुरली झाडे आणि बांधकामे यांना घेऊन जातात आणि त्याचे परिणाम अखेर इर्षाळगड त्याचप्रमाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मानवी वस्तीतील भूस्खलन व दरडी येऊन झालेल्या घटना पाहता कोकणातील जनतेने अजूनही त्यातून बोध घेतलेला नाही.

कोकणात मंडणगडच्या अलीकडे शेनाळे गावात काही वर्षांपूर्वी प्रचंड भूस्खलन होऊन मोठा रस्ता वाहून गेला होता. सुदैवाने उतारावर वस्ती नसल्याने मनुष्यहानी झाली नाही. तो प्रकार पठारावर पाणी साठून झाला होता. तसाच प्रकार लवासा येथील डोंगर उतारावरील फार्म हाऊस संकल्पनेतून बांधलेला बंगला देखील चालू वर्षाच्या पावसाळ्यात डोंगर माथ्यावरून खाली येऊन रस्त्यावर आल्याची घटना घडली आहे
आज वायनाड भविष्यात कोकणात हिच परिस्थिती उद्भवणार!
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिथे जिथे डोंगरावरून समुद्र दिसतो, अशा सर्व जागा आज ते आहे फार्म हाऊस संकल्पनेच्या नावाखाली राजकारणी व खाजगी उद्योगाने “एनए प्लॉटिंग” संकल्पनेतून फार्म हाऊस बांधणे या गोंडस नावाखाली विकसित केल्या आहेत. कोकणातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर व डोंगर टेकड्यांवर बेसुमार वृक्षतोड करून जमिनीच्या मूळ रचनेत सुरुंग लावून तसेच जेसीबी व पोकलेन यंत्राचा अमर्याद वापर करून निसर्गाचा समतोल बिघडवण्याचे काम अनेक ठिकाणी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्याच पद्धतीने डोंगर माथ्यावरील व टेकड्यांवरील पाण्याचे मूळ प्रवाह वळवून किंवा बुजवून त्यात बांधकामे झाली आहेत. उभ्या डोंगराचा “स्लाईस” काढून त्यावर बंगलो उभे राहत आहेत. अशा पठारावरून खाली सुंदर, निळाशार समुद्र दिसतो, पण त्याचवेळी खाली डोंगर उतारावर असलेली वस्ती ही एका धोक्याच्या दिशेने इंच इंच सरकत असल्याचे भान विकासाकांना तर नाहीच परंतु ज्यांनी या फार्म हाऊस संकल्पनेतून घरे खरेदी केली आहेत त्यांना देखील नसल्याने कोकणची अवस्था देखील लवकरच केरळमधील वायनाड सारखी होईल, तेव्हा येणाऱ्या काळात हे घडले तर नवल वाटू नये.

कोकणला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. त्यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात समुद्रापासून एक ते तीन किलोमीटरवर असलेल्या सगळ्या डोंगर पठारावर हीच स्थिती आहे. त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी भविष्यात कधी ना कधी एक “वायनाड” होणार आहे!
वडिलोपार्जित जागा विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल?
कोकणातील स्थानिक भूमिपुत्राने वडिलोपार्जित जमिनी मुंबई, ठाणे, गुजरात, कर्नाटक व केरळ या राज्यातील धनदांडग्यांना अल्प मोबदल्यात विकलेल्या आहेत. पूर्वी मालकी हक्काच्या असलेल्या जमिनीवर आज तोच शेतकरी वॉचमन म्हणून त्या ठिकाणी काम करीत असून केवळ विकल्या गेलेल्या जमिनीकडे बघण्या वाचून शेतकऱ्याच्या हातात काहीही राहिलेले नाही व त्याच जागांवर खाजगी विकासाने मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊस संकल्पनेच्या नावाखाली आलिशान बंगले उभारले आहेत.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह ठाणे व पालघर जिल्ह्यातील महसूल अधिकारी, बिल्डर, इस्टेट एजंट, कंत्राटदार व फार्म हाऊसच्या नावाखाली विकास करणारे विकासक हे प्रत्येकजण आपापल्या परीने कोकणातील निसर्ग संपन्नतेने नटलेल्या डोंगरांना वायनाडच्या दिशेने इंच इंच सरकवत असून भूस्खलन होऊन डोंगराखाली असणारी गावे गाडली गेली की मृतांच्या नातेवाईकांना योग्य आणि चांगली नुकसानभरपाई मिळवण्याचे प्रयत्न करणे व त्यासाठी मोर्चे आंदोलन व आमरण उपोषण करणे एवढेच कोकणकर जनतेच्या हाती राहिले आहे. त्यामुळे कोकणात केरळमधील वायनाड सारखी परिस्थिती भविष्यात उत्पन्न झाल्यास नवल वाटणार नाही.