शशिकांत मोरे
धाटाव : रोह्यात कुंडलिका नदीपात्रात एकाने उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली होती. या व्यक्तीचा शोध तब्बल तीन दिवसानंतर चोरढे (ता. मुरुड) येथे लागला. सदर घटना ताजी असतानाच मुंबईतील १० तरुण वर्षासहलीनिमित्त रोह्यात आले होते. चणेरा भागातील खांबेरे हद्दीतील बोबडघर आदिवासीवाडी जवळील असलेल्या बंधाऱ्यात हि मंडळी मौजमजा करण्यासाठी गेली. या दरम्यान पाण्याचा अंदाज घेण्यासाठी हिमेश नारायण ठाकूर ( वय १७ रा. खारदांडा-मुंबई) हा तरुण उतरला असता त्याचा पाय घसरल्यामुळे तो पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी ( ता. २) घडली आहे.
दरम्यान, या बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी रोहा तहसीलदार किशोर देशमुख, नायबतहसीलदार राजेश थोरे, स्थानिक तलाठी विशाल चोरगे तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली. शनिवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती प्रशासनाने दिली. या घटनेमुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे.
गेली ४ ते ५ दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले हे ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण जीवाची पर्वा न करता वर्षा सहली निमित्ताने डोंगर भागातील निसर्गरम्य व धबधबे असलेल्या ठिकाणी येत आहेत. डेंजर झोन भागात जात असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पाण्यात आनंद घेण्यासाठी जात असतात हि मौजमजा अनेकांच्या जीवावर बेतू शकते. अशा दुर्देवी घटना देखील घडल्या आहेत.
दरम्यान, हिमेश नारायण ठाकुर हा तरुण खारदांडा-मुंबई येथून खांबेरे येथील बोबडघर आदिवासी वाडी जवळील बंधाऱ्यात आपल्या मित्रांसह गेला होता. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी हा तरुण पाण्यात उतरला असता त्याचा पाय घसरल्यामुळे तो तरुण पाण्यात बुडाला. या तरुणाचे रोहा पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन तसेच सह्याद्री वन जीवन रेस्क्यू टीम तसेच स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. शनिवारी (ता. ३) सकाळी त्याचा मृतदेह सापडल्याचे नायब तहसीलदार राजेश थोरे यांनी सांगितले आहे.