नागोठणे: “महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व आणि विकासाचा महामेरू अजितदादा पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढता येणार नाही. मात्र, त्यांचे अपूर्ण राहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे आणि येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करणे, हीच त्यांना अर्पण केलेली खरी ‘श्रद्धांजली’ ठरेल,” अशा भावना नागोठणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार किशोर जैन यांनी व्यक्त केल्या.

अजितदादांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच नागोठणे परिसरात शोककळा पसरली. ५ जानेवारी रोजी किशोर जैन यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याकरीता अजितदादा नागोठणे येथे आले होते. यावेळी त्यांनी किशोर जैन यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पूर्ण पाठबळ देण्याचे वचन दिले होते. याप्रसंगाची आठवण सांगताना किशोर जैन भावूक झाले होते. ते म्हणाले की, दादांच्या कामाची शिस्त आणि सामान्यांच्या प्रश्नांची जाण हीच आमची प्रेरणा आहे.
निवडणुकीच्या मैदानातून विजयाचा संकल्प
किशोर जैन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, दादांना अभिप्रेत असलेला राज्याचा विकास आपण पुढे नेऊ, नागोठणे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे, हेच आता आपले एकमेव उद्दिष्ट आहे. या कठीण प्रसंगात खचून न जाता अधिक ताकदीने जनतेच्या सेवेसाठी सज्ज राहा.
”अजितदादांच्या जाण्याने आम्ही आमचा आधार गमावला आहे. पण त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आमच्यासोबत आहे. नागोठणे गटातील जनता दादांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीला नक्कीच साथ देईल आणि हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी मानवंदना असेल.”
— किशोरशेठ जैन
किशोर जैन यांनी यावेळी मतदारांना आवाहन केले की, विकासाचे राजकारण जिवंत ठेवण्यासाठी ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटण दाबून दादांचे स्वप्न साकार करावे.
