मिलिंद माने
महाड : तालुक्यात दिवसेंदिवस वनखात्याच्या भोंगळ कारभारामुळे वारेमाप वृक्षतोड होत आहे. त्यातच खाजगी जागेतील खैर वृक्षतोड केल्याबद्दल आरोपींवर कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या व्यक्तीला जागेचा सातबारा व नकाशा आणा, मगच कारवाई करतो असे उत्तर महाडच्या वनखात्याने दिल्याने ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय’ असा वन खात्याचा कारभार असल्याची प्रतिक्रिया तक्रारदाराने व्यक्त केली आहे.
महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील वसाप गावातील प्रमोद मोहन दळवी यांच्या खाजगी मालिकेतील गट क्रमांक 31 मधील शेतमळ्यालगत असलेल्या जमिनीतील खैराचे झाड तोडून नेल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी घडली. वसाप गावातील शेतकरी प्रमोद दळवी यांच्या खाजगी मालकीतील गट नंबर 31 मधील खैराच्या वृक्षांची चोरी बबन महिपती वाघमारे व सुरेश महिपती वाघमारे, रा. कुंभार्डे आदिवासी वाडी येथील रहिवाशांनी केल्याचे नितीन रमेश यादव रा. विन्हेरे, बौद्धवाडी यांनी पाहिले असल्याचे दळवी यांनी वनखात्याकडे केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.
याबाबत वसाप गावातील पोलीस पाटील सुवर्णा सुनील केरुंकर यांनी 5 ऑगस्ट रोजी गावातील रहिवाशांबरोबर एकत्रितरित्या जाऊन त्या जागी पंचनामा केला असता त्या जागेवरून खैराच्या वृक्षाची अनधिकृतरित्या तस्करी केल्याचे उघड झाले आहे. याबाबत प्रमोद दळवी यांनी महाड येथील वनखात्याच्या उपवन संरक्षक कार्यालयाकडे तक्रारी अर्ज दिला असता खैर तस्करांवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदाराला संबंधित जागेचा सातबारा व जागेचा नकाशा काढून आणा मगच प्रत्यक्ष येऊन पाहणी करून कारवाई करू असे अजब उत्तर दिल्याने ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय’ असा महाडच्या उपवन संरक्षक कार्यालयाचा कारभार चालत असल्याचे या तक्रारदाराच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.