अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पळसदरी येथे वडिलोपार्जित जमिनीचा वाद तसेच जमिनीच्या व्यवहारांत असलेल्या वादावरून अनिल हरीश्चंद्र देशमुख व त्याचे सहकारी रोहित मोहिते नांगुर्ले येथून भिलवडे येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पळसदरी सरपंच जयेंद्र गजानन देशमुख यांच्यासहित पाच आरोपी फरार असल्याची माहिती रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 25/06/2024 रोजी सकाळी 10.30 वा.च्या सुमारास जखमी अनिल हरीश्चंद्र देशमुख व त्याचे सहकारी रोहित मोहिते त्याचे क्रेटा कार क्र. एमएच 46 बीई 5260 मधून नांगुर्ले येथून भिलवडे येथे जात असताना पाच अनोळखी आरोपीतांनी कारमधून येवून त्यांना काही माहिती विचारण्याचा बहाणा करून गाडी थांबविण्यास सांगितले. त्यांनी गाडी थांबवल्यानंतर अनोळखी आरोपित यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड घेवून त्या लोखंडी रॉडने उपटी मारून गंभीर दुखापत करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद असल्याने त्या वादाचा राग मनात धरून सुडापोटी सदरचा प्रकार झाला असल्याचे सांगितले होते. त्याबाबत फिर्यादी अनिल देशमुख यांनी दिनांक 25/06/2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये जयेंद्र गजानन देशमुख, प्रशांत सुर्यकांत देशमुख, गजानन बाळाराम देशमुख, योगेश वसंत देशमुख, विवेक विश्वनाथ देशमुख, श्रीराम बाळाराम देशमुख, सचिन गजानन देशमुख (सर्व रा. म्हारळगाव ता. कल्याण जि. ठाणे) व इतर ५ अनोळखी इसम यांचे विरुद्ध गु.र.जि. नं 180/2024 भा.द. वि. कलम 307,324,506,143,147,148,149,120 (ब) सह मु. पो. कायदा कलम 37(1) (3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास कर्जत पोलीस ठाणे करीत असताना तपासादरम्यान आरोपी योगेश वसंत देशमुख यास दिनांक 25/06/2024 रोजी अटक करण्यात आली. परंतु, गुन्ह्यातील इतर ५ अनोळखी आरोपी यांचेबाबत काहीएक माहिती प्राप्त होत नव्हती. त्याच दरम्यान गुन्ह्यातील आरोपी जयेंद्र देशमुख याने कट करून ५ अनोळखी इसम यांना पैश्याचे आमिष दाखवून त्यांनीच सदरचा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगण्याबाबत समजावून एका होंडा सिटी कारसह कर्जत पोलीस ठाणे येथे आत्मसमर्पण करण्याबाबत सूचना देवून पाठविले. परंतु पोलिसांना त्याबाबत संशय आल्याने इसमाकडे सखोल विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्यातील खरे आरोपी नसल्याचे सांगून त्यांना आरोपी जयेंद्र देशमुख याने पैश्याचे व नोकरीचे आमिष दाखवून सदरची केस अंगावर घेण्यासाठी पाठवून दिले असल्याचे कबुल केले.
सदरचा गुन्हा क्लीष्ट, गुंतागुतीचा व व्याप्ती मोठी असल्याने त्यानंतर दिनांक 31/07/2024 रोजी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या सूचना देवून व मार्गदर्शन करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड हे करतील असे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहा. पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर व ८ पोलीस अंमलदार यांचे विशेष टीमचे गठन करून त्यांना तपासाबाबत योग्यते मार्गदर्शन केले. त्यानुसार गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तसेच सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे गुन्ह्यातील ५ अनोळखी आरोपी म्हारळ ता. कल्याण, जि. ठाणे येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. सदर बाबत तात्काळ हालचाली करून म्हारळ कल्याण येथून दिनांक 02/08/2024 रोजी शुभम राजेंद्र कांगणे (वय-26 वर्ष रा.रूम नं.08 ओमसाई नगर सेंच्युरी शाळेसमोर म्हारळगाव ता. कल्याण जि.ठाणे), नंदेश मिलिंद खताते (वय 22 वर्ष रा. आशीर्वाद अपार्टमेंट रूम नं.02 जी विंग तळमजला एमआयडीसी रोड म्हारळगाव ता. कल्याण जि.ठाणे) या दोघांना ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता त्यांनी आरोपी पळसदरीचा सरपंच जयेंद्र देशमुख, प्रशांत देशमुख यांचे सांगण्यावरून त्यांनी व त्यांचे साथीदार राजेश सिंग, नितेश सिंग, बंटी कांबळे (सर्व रा. म्हारळ गाव ता. कल्याण जि.ठाणे) यांनी आपसात संगनमत करून केला असल्याचे सांगितले म्हणून त्यांना दिनांक 03/08/2024 रोजी १२.५५ वाजता अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी यांचा पूर्व गुन्हेगारी इतिहास पडताळला असता त्यांचे विरोधात ठाणे ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाणे येथे अशाच प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अटक आरोपित यांचेकडून गुन्हा करताना वापरलेले हत्यार ३ लोखंडी रॉड, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली होंडा सिटी मोटार कार क्र. एमएच 05 सीएम 2387 ही जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपी सध्या मा. न्यायालयाचे आदेशाने पोलीस कोठडीत असून इतर ३ अनोळखी आरोपित तसेच आरोपी जयेंद्र गजानन देशमुख, प्रशांत देशमुख दोन्ही (रा.नांगुर्ले, पो. पळसदरी, ता कर्जत, जि. रायगड) यांचा शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहाय्यक फौजदार प्रसाद पाटील, संदीप पाटील, पोलिस हवालदार सुधीर मोरे, पश्याम कराडे, प्रतिक सावंत, राकेश म्हात्रे, अक्षय जाधव, ईश्वर लांबोटे व सायबर पोलीस ठाणेतील अक्षय पाटील यांनी गुन्ह्याचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.