मिलिंद माने
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सर न्यायाधीशांनी महत्त्वाचा संकेत दिला असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिली आमदार अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालेल असे स्पष्ट संकेत सरन्यायाधीशांनी दिल्याचे सिद्धार्थ शिंदे म्हणाले याबाबतचा निकाल सप्टेंबर महिन्यात लागण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
आमदार अपात्रता प्रकरणात दोन्ही बाजूंनी सुनावणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुनावणी होऊन त्याचा निकाल लागेल. येत्या एक-दोन दिवसात पुढची तारीख मिळेल. सप्टेंबरमध्ये मात्र आमदार अपात्रते संदर्भातले प्रकरण ऐकून निकालात काढले जाईल असा विश्वास सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाद मागण्यात आली होती. २९ जुलै रोजी अजित पवारांना चार आठवड्यात उत्तर देण्याची मुदत देण्यात आली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना तीन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. म्हणजे त्यांचीही प्रक्रिया आता सुरू झाली असल्याचे वकील सिद्धांत शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात ६ ऑगस्ट २०२४ रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र, या प्रकरणाची सुनावणी आज झाली नसली तरी आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुनावणी होईल आणि निकालही त्याच वेळेला लागेल अशी शक्यता वकील सिद्धांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांना न्यायालयाने मागील सुनावणी वेळी अपात्र का करू नये? असा सवाल करत त्यांनी त्यांना याबाबत नोटीस बजावली असल्याने शिंदे गटाच्या आमदारांचे देखील धाबे दणाणले आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केल्या होत्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकांची सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतल्यामुळे आमदार अपात्रते प्रकरणाची सुनावणी महत्त्वाची ठरली आहे.