• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटनाचा बार!

ByEditor

Aug 6, 2024

घन:श्याम कडू
उरण :
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेता इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. काही विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी व विरोधक आपण मतदार संघाचा कसा विकास केला हे दाखविण्यासाठी गेली अनेक वर्षे रखडलेल्या शासकीय प्रकल्पाचे उदघाटन करण्याचा घाट सध्या जिल्ह्यातील मतदार संघात सुरू आहे. हे दाखवून विकास आपणच केल्याचा दावा करून मतांचा जोगवा मतदारांकडे मागण्यांसाठी हा सारा खटाटोप सुरू आहे.

विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसांत होण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहिता लागल्यानंतर निवडणूक होईपर्यंत कोणत्याच कामांचे अथवा प्रकल्पाचे उद्घाटन करता येणार नाही. त्यामुले मतदारांना भुलविण्यासाठी आपल्या मतदारसंघात कशाप्रकारे विकास केला हे दाखविण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेले शासकीय कार्यालय अथवा सामाजिक उपक्रम आपणच रावबिला असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी अधिकारी वर्गाना वेठीस धरून एकदाची आपली छाप मतदारांवर बिंबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यापूर्वी केलेल्या निकृष्ट दर्जाचे कामांचे पितळ उघडे पडूनही त्यावर बोलण्याऐवजी कोट्यवधी रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाच्या कामांचे अथवा प्रकल्पाचे उद्धाटन करून घेण्यासाठी सर्व पक्षाचे इच्छुक त्यामध्ये आजी माजी व इच्छुक उमेदवार यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यामुळे सदरची कामे निकृष्ट दर्जाची होऊन शासकीय अधिकारी वर्ग ही यामध्ये आपला आर्थिक स्वार्थ साधताना दिसत आहेत. याचा विचार मतदारांनी करणे आवश्यक बनले आहे. मत मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार आश्वासनाची खैरात करून भुलविण्याचा प्रयत्न करतील. तरी मतदारांनी आपले बहुमूल्य मत विकास करणाऱ्या उमेदवारालाच द्यावे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!