• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोळघर आश्रमशाळेतील परीस्थिती ‘जैसे थेच’!

ByEditor

Aug 6, 2024

अमुलकुमार जैन
अलिबाग :
कोळघर आश्रम शाळेतील परीस्थिती आज ही जैसे थेच आहे. आश्रमशाळेच्या इमारतीत अस्वच्छ शौचालय, दाटीवाटीने मुलांची राहण्याची व्यवस्था यामध्ये काडीचाही बदल झाल्याचे दिसून आले नाही. शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी यांनी मंगळवारी या आश्रमशाळेला भेट देत आश्रमशाळेची पाहणी करीत या गलथान कारभारावर तेथील मुख्याध्यापकांना धारेवर धरले होते.

अलिबाग तालुक्यातील कोळघर येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत पहिली ते दहावीपर्यंत प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा आहे. शाळेची दोन मजली इमारत असून, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खोल्या, वर्ग, भोजन कक्ष, कार्यालय, स्वच्छतागृह आहेत. येथील सर्वच खोल्यांना गळती लागल्याने पावसाच्या पाण्यामुळे मुलांची अंथरूण भिजत आहेत. तसेच भिंतीचे पोपडे निघाले आहेत. इमारत स्वच्छतेसाठी एकच स्वच्छता कर्मचारी असून, स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दुर्गंधीमध्येच विद्यार्थ्यांना राहावे लागत आहे. आठ दिवसांपुर्वी हा सारा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर आता येथील परीस्थिती सुधारेल असे वाटले होते. मात्र तसे न होता केवळ तीन वर्ग खोल्यांची दाखविण्यापुरतीच स्वच्छता करण्यात आली होती.

शाळेत मुलांसाठी आले असलेले नवीन बेड इमारतीच्या छतावर तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुलांना आज जूनेच बेड वापरावे लागत आहेत. हे विदारक चित्र मानसी दळवी यांनी पहाताच संबधीतांवर प्रश्नांची सरबत्ती लावत हि आदिवासी मुलं माझी असून त्यांच्या पालनपोषणात कोणतीही हयगय झालेली खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे. मात्र मागील आठ दिवसात परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. आजही शौचालय आणि अंघोळीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आहे. जेवणात नेहमीच शाकाहारी जेवण दिले जाते, तेही रुचकर नसल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांनी पुन्हा आश्रमशाळेची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या नरकयातना पाहून संताप व्यक्त केला आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याऱ्यांसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे. आठ दिवसांत सर्व सुविधा पुरवा अशा सूचना मानसी दळवी यांनी केल्या होत्या, मात्र अद्याप कोणताही बदल करण्यात आला नसल्याने मानसी दळवी संबधीतांवर कडाडल्या.

अदिवासी मुलांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदिवासी मंत्री यांना भेटून माहिती देणार आहे. येथील सत्य परिस्थीती त्यांच्या समोर ठेवून तात्काळ या मुलांना न्याय मिळावा यासाठी कसोशिने प्रयत्न करणार आहे.
-मानसी दळवी,
शिवसेना नेत्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!