घन:श्याम कडू
उरण : जिल्हाधिकारी यांनी अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवून जसखार ग्रामपंचायत सरपंच काशीबाई ठाकूर यांना अपात्र ठरविले होते. त्याविरोधात काशीबाई ठाकूर यांनी अतिरीक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग, मुंबई यांच्याकडे अपील करून दाद मागितली. त्यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी या निर्णयाला स्थगिती दिल्याने सरपंचपदी काशीबाई ठाकूर यांना कायम ठेवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे काशीबाई ठाकूर यांनी आज पुन्हा सरपंचपदाचा पदभार स्वीकारला आहे.
जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांचेकडील आदेश ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक ०१/२०२३ दि. १९/७/२०२४ चे आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्यात आले होते. दि. २/८/२०२४ रोजी अपिलार्थी काशीबाई ठाकूर व सामनेवाले गर्दीष सुरेश म्हात्रे, ग्रामसेवक जसखार, जिल्हाधिकारी रायगड यांचे वकील स्थगितीच्या सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यावेळी वकिलांनी तोंडी युक्तिवाद केला.
अपिलार्थीने अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार सामनेवाले यांनी दाखल केली होती. सदर तक्रारीच्या आधारे अपिलार्थी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीकामी अपिलार्थीस कोणतीही सुनावणी अथवा उपस्थित राहून बाजू मांडण्याची संधी न देता अपात्रतेचा आदेश पारित केला. सदरच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती अपिलार्थी यांच्या वकिलांनी केली होती. तसेच सामनेवाले यांचे वकिलांनी त्याबाबतचे खंडन करणारे कोणतेही सकृतदर्शन करणारे तथ्ये समोर मांडले नाही. यामुळे अपिलार्थी व सामनेवाले यांचे वकिलांनी केलेला युक्तिवाद, आव्हानीत आदेशास पुढील तारखेपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी पारित केला. यानंतर सरपंच पदाचा पदभार काशीबाई ठाकूर यांनी आज पुन्हा स्वीकारला आहे.