विठ्ठल ममताबादे
उरण : बीएमटीसी कामगारांच्या ४० वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बीएमटीसी कामगारांनी ९ ऑगस्ट २०२४ रोजी सिडको गेटसमोर एक दिवसीय लाक्षणीक उपोषणाचा इशारा दिला होता. सिडको महामंडळाची तत्कालीन बीएमटीसी परिवहन सेवा काही अधिकारी, कर्मचारी आणि तत्कालीन राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे देशोधडीला लागली. त्यानंतर ४० वर्षापासून या कामगारांचा लढा सुरूच आहे. बीएमटीसी कामगारांना सिडकोकडुन १० बाय १०चे एकत्रित भुखंड तसेच थकीत नुकसानभरपाई मिळेल असा निर्णय १० जुलै २०१३ रोजी झाला होता.
सिडकोमुळे १८०० कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे. नवी मुंबई शहराची निर्मिती करताना १९७४ मध्ये बीएमटीसीची दादर ते पनवेल अशी पहिली बससेवा सुरू झाली. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यानंतर टप्याटप्याने २७० हून अधिक बस वाशी, घणसोली, ऐरोली, रबाले, ठाणे आणि बेलापूर या परिसरात धावत होत्या. तत्कालीन राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे ९ फेब्रुवारी १९८४ मध्ये ही बससेवा बंद पडल्याने १८०० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिवंगत दि. बा पाटील यांच्याकडे बीएमटीसी कामगारांनी न्याय देण्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी प्रशासनाची व कामगारांची सखोल माहिती असणारे नेते म्हणुन ही जबाबदारी कामगार नेते दिवंगत शाम म्हात्रे यांच्यावर सोपवली असता या कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना नवी मुंबईत १० वाय १० चौरस फुटाचे एकत्रित भुखंड देण्याचा ऐतिहासिक ठराव दिवंगत शाम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडको संचालक मंडळाने १० जुलै २०१३ रोजी घेतला.
शाम म्हात्रे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या श्रुती शाम म्हात्रे ह्या कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी आत्ताचे मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वेळोवळी बैठका करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. सिडको महामंडळाकडुन सर्व कामगारांना गाळे देण्याचा प्रस्ताव देखील फेटाळला गेला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ्याची उपलब्धता होऊ शकणार नाही या कारणाने एकत्रित भुखंड देण्याच्या प्रस्तावावर सिडको महामंडळ व महाराष्ट्र शासन तसेच बीएमटीसी कामगारांचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये गेल्या अडीच वर्षापासून चर्चा सुरू असुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी बीएमटीसी कामगारांचे शिष्टमंडळ यांच्या मागणीबाबत अवगत करत असुन देखील आज रोजी सिडकोकडुन बीएमटीसी कामगारांच्या सार्थ मागणीचा प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यास दिरंगाई होत असल्याने बीएमटीसी कामगार तसेच त्यांच्या कुटुंबियांनी श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शुकवार, दि. ९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शुकवार, दि. ९ ऑगस्ट रोजी बीएमटीसी कर्मचारी पुनर्वसन समितीद्वारे होणाऱ्या या ऐतिहासीक आंदोलनाच्या निमित्ताने कामगारांच्या एकजुटीला आव्हान म्हणुन ४० वर्षापासून देशोधडीला लावलेल्या कामगारांना ग्रहन म्हणुन काही राजकीय नेते त्यांचा वेडा प्रयत्न त्याठीकाणी मुठभर लोकांना घेऊन करत आहेत. परंतु, यावेळी बीएमटीसी कामगार कोणत्याही राजकीय बड्या नेत्याच्या खोट्या आश्वासनाला बळी न पडता स्वतः ताकदीने सिडको गेटसमोर ९ ऑगस्ट रोजी उतरणार असल्याचा सर्व कामगारांचा ठाम निश्चय आहे. तसेच दिवंगत दि. बा. पाटील तसेच दिवंगत शाम म्हात्रे यांचे प्रकल्पग्रस्त बीएमटीसीचे अधुरे राहीलेले स्वप्न पुर्ण करण्याचा श्रुती म्हात्रे यांचा देखील ठाम निश्चय आहे. |