कृषी विभागाने लवकरच खतांची उपलब्धता करावी मनसेची मागणी
अनंत नारंगीकर
उरण : सततच्या पावसामुळे भातशेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. शिल्लक राहिलेल्या शेतीच्या पिकाला जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे कृषी विभागाने उरण तालुक्यात खतांची उपलब्धता करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी केली आहे.
मागील वीस दिवस सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीतील भात पिके कुजून गेली होती. शेतकऱ्यांनी आपली शेती ओसाड पडू नये या करिता अनेक प्रयत्न करीत वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतातून थोडी थोडी रोपे जास्तीचे मंजूर घेऊन आणले आणि त्यातील एक एक काडी शेतात लावण्यात आली आहे. मात्र आता लावलेल्या रोपाची वाढ होण्यासाठी गरज आहेत ती खतांची. मात्र, उरण तालुक्यात कोठेही खत पुरवठा उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अनेक व्हाट्सअप ग्रुपद्वारे त्या त्या गावातील शेतकरी कोठे खते शिल्लक असल्याची माहिती विचारत आहे.
पुर्वी शेतकरी आपल्या गोठ्यातील शेण, गोवर शेतकरी खत म्हणून वापर करत होते. सध्या गुरेढोरे शिल्लक नसल्याने शेतकरी खतांचा वापर करत आहेत. त्यामुळे यावेळी खतांच्या तुटवड्यामुळे शेतीला बहर येणार नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची उरली सुरलेली शेतीही धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. तरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खतांचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी केली आहे.