• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात बळीराज सेना आपला उमेदवार उभा करणार -अशोक वालम

ByEditor

Aug 11, 2024

मजिद हजिते
माणगाव :
कुणबी समाजाच्या प्रगतीसाठी तसेच आपल्या समाजाचा पक्ष असावा असे प्रत्येक कुणबी समाजातील बांधवांना वाटत होते म्हणून राज्यात कुणबी समाजातर्फे बळीराज सेनेची स्थापना करण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असून श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात देखील बळीराज सेना आपला उमेदवार उभा करून निवडणूक लढवणार असल्याचे बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी बळीराज सेनेच्या जनसंवाद दौऱ्यात माणगाव येथे बोलताना जाहीर केले.

माणगाव शहरातील कुणबी समाज सभागृहात बळीराज सेनेतर्फे जनसंवाद दौरा बळीराज सेनेचे उपाध्यक्ष कृष्णा कोबवान, माणगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मोरे, कुणबी समाजाचे नेते महादेव भक्कम, काका नवगणे, सुरेश मगर तसेच समाजातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी कुणबी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी सांगितले की, आजपर्यंत कुणबी समाजाचा इतर पक्षांनी मतांसाठी वापर करून घेतला, आपला कोण परका कोण याचा समाजाने कधी विचार केला नाही. कोणी गोड बोलला की आपण त्याच्या पाठीमागे धावत बसलो. १९९० सालापासून आजपर्यंत आपला प्रतिनिधी नाही. समाजाच्या माणसाला तिथपर्यंत इतर राजकारणी पोहोचू देत नाहीत. कुणबी समाजाची वाताहात राजकारण्यांनी केली आहे. इतका मोठा समाज असून देखील समाजाच्या माणसाला राजकारणात संधी मिळाली नाही. आपला समाज विविध पक्षात विखुरला गेला आहे. समाजाचे नेते तात्पुरते एकत्र येतात व नंतर वेगळे होतात, पण आता तसे होणार नाही. आता समाज एकत्र झाला पाहिजे. ६५ ते ६० टक्के कुणबी समाज असून त्यांचा उपभोग विविध राजकीय पक्षाने करून घेतला आहे. आपण इतकी वर्ष फक्त इतरांच्या पालख्या वाहण्याची कामे केली आहेत, आता तसेच चालणार नाही. कुणबी समाजाचे राज्य येण्यासाठी बळीराज सेनेची स्थापना करण्यात आली असून लाथ मारून पाणी काढण्याची ताकद कुणबी समाजात आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक समाज बांधव व नेत्यांनी राजकीय पादत्राणे बाहेर काढली तर समाजाची ताकद वाढेल. राजकारण्यांनी कुणबी समाजाची नाडी ओळखली आहे, आपण समाज बांधव जर एकत्र राहिलो तर समाजाची प्रगती होईल. आज कुणबी समाजाचा एकही आमदार नाही. समाजाने ठरविले तर समाजाचा आमदार सहज निवडून येऊ शकतो. रायगड जिल्ह्यात कुणबी समाज फार मोठा आहे, पण समाजाचा फक्त वापर राजकारण्यांनी करून घेतला, पण आता तसे चालणार नाही. समाज एकवटला आहे, कुणबी समाज आपली ताकद दाखवणार आहे.

माणगावमध्ये बळीराज सेनेच्या जनसंवाद दौऱ्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!