रायगडचे संपर्कप्रमुख संजय कदम यांना पदावरून हटविले
मजिद हजिते
माणगाव : रायगडातील ठाकरेंच्या शिवसेनेत आश्चर्यचकित करणारा मोठा बदल करण्यात आला असून रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या जागी आता नागेंद्र राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांत विधानसभा निवडणुका जाहीर होतील. त्यापुर्वी केलेल्या ह्या बदलामुळे शिवसेनेला फायदा होतो की नुकसान हे पाहणे महत्वाचे राहील. शिवसेना फुटीनंतर पोलादपूरचे स्थानिक असलेले संजय कदम यांची संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर त्यांनी रायगड जिल्ह्यात संघटना बळकट करण्यासाठी गाव संपर्क अभियान, मोहल्ला संपर्क अभियान राबविले आणि कार्यकर्त्यांना बळ दिले. त्याचा प्रभाव हा रायगड लोकसभा निवडणुकीत दिसला. महाड मतदारसंघात भरत गोगावले यांचे वर्चस्व असतानाही ठाकरे गटाच्या उमेदवाराला मोठं मताधिक्य घेण्यात यश आले तर श्रीवर्धन मतदार संघ हा तटकरे यांचा बालेकिल्ला असतानाही त्या ठिकाणी मोठी लीड घेण्यापासून रोखण्यात ठाकरे गटाला यश आले.
संपर्कप्रमुख संजय कदम यांनी पक्षाला रायगडमध्ये नवी संजीवनी दिली होती. त्यामुळे गावागावात संजय कदम हे नाव परिचित झाले होते. विधानसभा निवडणुकीपुर्वी संपर्कप्रमुख बदलण्याचा ठाकरे गटाने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य? हे काही काळात स्पष्ट होईल, मात्र स्थानिक असलेल्या संजय कदम यांच्या जागी आयात संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांची नियुक्ती केल्याने अनेक शिवसैनिक नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच एक निष्ठावंत शिवसैनिक पुन्हा रायगडमध्ये पक्षांतर्गत राजकारणाचा बळी ठरला असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.