मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
यंदापासून मोठा बदल होणार
परीक्षा मंडळाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील परीक्षांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कालावधीमध्ये यावेळी १० दिवसांचा फरक असणार आहे. यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ऐवजी ११ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्च ऐवजी २१ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहे. तर, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यासोबत हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे यादृष्टीने या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
बोर्डाच्या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय?
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यत जाहीर होईल, असा अंदाज बोर्डाने वर्तवला आहे. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाण्याची शक्यता आहे.