मिलिंद माने
मुंबई : राज्यातील महसूल कर्मचारी बदल्यांसाठी महसूल मंत्री, महसूल राज्यमंत्री तसेच संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांचे शिफारस पत्र जोडून बदल्यांसाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवत असतात. यामुळे स्थानिक पातळीवरील कामांमध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्याने यापुढे राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या या राज्यातील सहा विभागातील त्या त्या विभागीय आयुक्तांमार्फत करण्यात येतील असे आदेश महसूल व वन विभागाने जारी केले आहेत.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने शासन निर्णय क्रमांक २०२४/ प्रकरण १००/ ई-७ १२ ऑगस्ट २०२४ रोजी आदेश काढून महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबात प्रतिबंध अधिनियम २००५ मधील कलम ६ मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारांच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याबाबतचे असलेले बदली अधिनियमातील कलम(४) (४) (दोन) व४ (५) नुसार बदलीबाबतचे माननीय मंत्री महसूल यांचे अधिकार या आदेशान्वये अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लघु टंखलेखक, महसूल सहाय्यक, वाहनचालक व तलाठी या गट क कर्मचाऱ्यांच्या बदल्या यापुढे विभागीय आयुक्त करतील, तर गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करतील असे राज्य शासनाने काढलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.
यामुळे आता महसूल कर्मचाऱ्यांच्या मंत्रालयाच्या वाऱ्या कमी होणार असल्याचे संकेत यानिमित्ताने प्राप्त होत आहेत. मात्र अपवादात्मक परिस्थितीमुळे अथवा विशेष कारणामुळे बदली करावयाची असल्यास बदली करणाऱ्या लगत वरिष्ठ प्राधिकार्याच्या मान्यतेने बदली करता येईल.