मुंबई : बहिणीच्या विरोधात पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उभं करायला नको होतं. पार्लमेंट्री बोर्डाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. एकदा बाण सुटल्यानंतर माघारी घेता येत नाही. मात्र माझं मन आज मला सांगतंय, की तसं नको व्हायला होतं” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजयीत सामना झाला होता. त्यात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला
“बारामतीत तुमची कोणी लाडकी बहीण आहे का?” असा तिरकस सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, “राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, पण सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी आहेत. अनेक घरांत राजकारण चालतं. पण राजकारण हे घरात शिरु द्यायचं नसतं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं. पार्लमेंट्री बोर्डकडून सुनेत्रांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. बाण एकदा सुटला, की तो माघारी घेता येत नाही. मात्र आज माझं मन मला सांगतं, की तसं व्हायला नको होतं,” असं अजित पवार म्हणाले.
रक्षाबंधनाच्या दिवशी आपण सुप्रिया सुळेंकडे जाणार का? असाही प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. “माझा सध्या राज्यभर दौरा सुरु आहे. मात्र राखी पौर्णिमेला मी जर बारामतीत असेन आणि माझ्या बहिणीही तिथे असतील तर मी नक्कीच जाईन” असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.